पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/123

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
.६.


भारतीय मुसलमान


 फाळणीपासून बांगला देशच्या उदयापर्यंत भारतीय मुसलमानांच्या राजकारणाची दिशा समजून घेणे अगत्याचे आहे. ही दिशा हसन शहीद सुहावर्दी १० सप्टेंबर १९४७ रोजी चौधरी खलिकुत्झमान यांना लिहिलेल्या एका पत्रात आखून दिलेल्या मार्गाने ठरून गेली आहे. सुहावर्दीनी पाकिस्तान ही आमची अखेरची मागणी नव्हे-सध्याची मागणी आहे असे म्हटल्याचे आपण मागे वाचले आहे. (पहा. 'Genesis of Pakistan' by Nagarkar, pp.402.) खलिकुत्झमान यांना लिहिलेल्या या पत्रात सुहावींनी भारतीय मुसलमानांनी कोणते धोरण स्वीकारावे हे सूचित केले आहे. ते म्हणतात, “आपल्यापुढे तीन पर्याय आहेत. एक तर मुस्लिम लीगच्या धोरणाला चिकटून राहणे आणि द्विराष्ट्रवादावर श्रद्धा ठेवणे किंवा मुसलमान राहून भारताच्या समान नागरिकत्वाच्या आधारे हिंदू शेजाऱ्यांबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करणे. परंतु यात काही अडथळे आहेत. मुस्लिम ऐक्याचे सामर्थ्य असल्याखेरीज हिंदू मुसलमानांबाबत आदर दाखवणार नाहीत. तिसरा पर्याय आहे हिंदूंच्या पुढे मुसलमानांनी संपूर्णपणे शरणागती पत्करणे हे टाळण्यासाठी इतर तीन पर्याय दिसतात. मुसलमानांनी त्यांच्या बहुसंख्यांक वस्तीचे प्रदेश भारतात निर्माण करणे, लोकसंख्येची अदलाबदल करणे किंवा त्यांचे संपूर्ण शिरकाण होणे. त्यांच्या मते सर्वांत चांगला पर्याय दोन्ही देशांतील बहुसंख्यांकांनी अल्पसंख्यांकांच्या मनात सुरक्षितता आणि विश्वास निर्माण करणे.
 सु-हावदींच्या पत्राचा उल्लेख भारतीय मुसलमानांच्या पुढील धोरणाची दिशा पुरेशी सूचित करण्यासाठी केला आहे. त्यातील अनेक पर्यायांतील काही सूचना घेऊन त्यांनी स्वतंत्र भारतात आपली वाटचाल सुरू केली आहे. या वाटचालीची चर्चा करण्यापूर्वी १९४७ च्या परिस्थितीवर ओझरती नजर टाकणे उपयुक्त ठरेल.