पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/122

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विस्तारवादी धोरणाशी त्या राष्ट्राची मनोवृत्ती जखडली गेली आहे. त्याला भारताचे विघटन व्हायला हवे होते. त्याखेरीज प्रदेशविस्ताराची त्याची आकांक्षा पुरी होऊ शकतच नव्हती आणि येथे बड्या राष्ट्रांची आणि पाकिस्तानची उद्दिष्टे यांत भिन्नता आढळते. कारण भारत मोडूही नये आणि बळकट होऊही नये हे बड्या राष्ट्रांचे नेमके धोरण होते. याकरिता भारतालाही थोडी मदत द्यायची, थोडी शस्त्रे पुरवायची, सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण होऊ द्यायचे नाही. त्याचबरोबर भारताच्या दुप्पट तिप्पट प्रमाणात पाकिस्तानला आर्थिक मदत द्यायची हे धोरण त्यांनी स्वीकारले होते. म्हणूनच अमेरिकेने भारताला अवजड उद्योगधंदे उभे करण्यात कधी मदत केली नाही आणि रशियाने भारताच्या अणुशक्ती विकासाकडे फारसे सहानुभूतीने पाहिलेले नाही. अण्वस्त्रस्फोटबंदी करारावर सही करण्याचे नाकारण्याच्या कृत्याबद्दल नापसंती व्यक्त करायला रशिया आणि अमेरिका ही दोन्ही राष्ट्रे एकत्र आली याचा अर्थ आम्ही समजून घेतला पाहिजे.
 भारताचे विघटन करण्याचे पाकिस्तानचे धोरण आणि भारताला मोडू न देण्याचे बड्या राष्ट्रांचे धोरण ही परस्परविरोधी धोरणे होती, हे विधान एका मर्यादित अर्थानेच मला अभिप्रेत आहे. भारतात अराजक माजू नये हे बड्या राष्ट्रांचे उद्दिष्ट आहे. या अराजकाच्या लोंढ्यातून जी उलथापालथ होईल ती नेमकी कोणत्या राष्ट्राला फायदेशीर पडेल हे एकमेकांच्या प्रभावक्षेत्राला काटशह देणाऱ्या बड्या राष्ट्रांना माहीत नसल्यामुळे त्यांना संपूर्ण अराजक नको होते इतकाच त्यांचा अर्थ आहे. भारतातील केंद्रसत्ता दुबळी राहावी आणि या खंडप्राय देशाचे तीनचार तुकडे व्हावेत आणि त्याची सार्वभौम राष्ट्रे अस्तित्वात यावीत अशी पर्यायी धोरणे बड्या राष्ट्रांची असावीत असे मानायला आधार आहे. भारताच्या धार्मिक फाळणीला भारतीय कम्युनिस्ट पक्षाने तो हिरिरीने पाठिंबा दिला जो हा उपखंड एका मध्यवर्ती सत्तेखाली येऊ न देण्याच्या सोव्हिएत रशियाच्या प्रयत्नाचाच एक भाग होता. एरवी उघड उघड आक्रमक आणि दहशतवादी धार्मिक चळवळीला ‘धर्म ही अफूची गोळी आहे' असे रात्रंदिवस ओरडून सांगणाऱ्या कम्युनिस्टांनी पाठिंबा द्यावा यामागील विसंगती समजूच शकत नाही. भारताच्या पूर्व भागात डोंगरी जमातींनी केलेल्या बंडाला चीनने शस्त्रे पुरविणे हे चीनच्या या धोरणाचेच निदर्शक होते. भारताचा हा पूर्व विभाग भारतापासून अलग करण्याच्या शक्ती परकीय ख्रिश्चन मिशनऱ्यांकरवी अमेरिकन्स आणि कम्युनिस्टांकरवी रशियन्सही बळकट करीत होते.
 बांगला देशच्या उदयाने तिन्ही बड्या राष्ट्रांच्या भारतविषयक धोरणाचे धिंडवडे निघाले आहेत. रशियाने झटकन पवित्रा बदलला आणि भारताच्या वाढत्या सामर्थ्याशी आणि स्थानाशी जुळती अशी भूमिका घेतली. नजीकच्या भविष्यकाळात चीन आणि अमेरिकादेखील जुळते घेतील. चीनला बलवान होऊ न देण्याचे प्रयत्न फसल्यानंतर चीनशी अमेरिकेने जुळते घेतलेच. रशियन क्रांतीनंतर रशियाला वेढण्याचे प्रयत्नही केले गेले. भारताला या प्रयत्नांना तोंड देऊनच मार्ग काढावा लागणार आहे. पाकिस्तानची शकले उडाल्याने आपले स्थान प्राप्त करून घेण्याच्या मार्गातील एक मोठा अडथळा भारताने दूर केला आहे.


पाकिस्तानची उद्दिष्टे /१२१