पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/116

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अशा रीतीने या दोन्ही प्रदेशांमधील भारतीय प्रदेश जिंकण्याची शक्यता भारतात फार मोठी राजकीय उलथापालथ झाल्याखेरीज निर्माण झाली नसती. राजकीयदृष्ट्या भारत दुबळा झाल्याशिवाय आंतरराष्ट्रीय दडपणाने कॉरिडॉरची सवलत मिळविणे नजीकच्या काळात शक्य नव्हते. राजनैतिकदृष्ट्या भारत दुबळा करण्याचे प्रयत्न चालू ठेवून, पाकिस्तानच्या दोन्ही विभागांना सलग असे काहीच भारतीय प्रदेश मिळविण्याची आकांक्षा धरणे हा एक तात्पुरता मार्ग होता. पश्चिम पाकिस्तानला सलग असलेला गुरुदासपूर जिल्हा, राजस्थान सीमेजवळचा काही भाग ही पाकिस्तानची लक्ष्ये होती. पूर्व विभागाला याकरिताच आसामचे आमिष दाखविण्यात आले होते. या सर्व प्रदेशांपैकी जम्मू आणि काश्मीर यांच्यावर तेवढा उघड दावा केला जात होता. असा उघड दावा लोकसंख्येच्या आधारे इतर प्रदेशांवर पाकिस्तानला करता येणे शक्य नव्हते. पण आसाममध्ये घुसखोर पाठवून व मुस्लिम लोकसंख्येचे प्रमाण वाढवून पुढेमागे दावा करता येण्याची योजना पाकिस्तानने आखून ठेवली होती. घुसखोरांना परत पाठविण्याची कारवाई सुरू झाली आणि १९६४ च्या दंग्यात सुमारे दहा लाख हिंदू भारतात पाठवून 'घुसखोरांना परत पाठविल्यामुळे पूर्व बंगालमध्ये दंगली झाल्या' अशी सबब आयूबखानांनी सांगितली. दरम्यान पूर्व बंगालमध्ये वेगळ्या राष्ट्रवादाच्या निष्ठा एवढ्या फोफावल्या की प्रथमच पाकिस्तान आपल्या अंतर्गत प्रश्नांत गुंतून पडले. ते एवढे गुंतून पडले की भारताला त्रास देण्याची त्याची ताकद खच्ची झाली.
 'बांगला देश' च्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास इथे सांगण्याची आवश्यकता नाही. पाकिस्तानच्या भारतविरोधी धोरणातील काही मुद्यांची या प्रश्नाच्या संबंधात फक्त येथे चर्चा करावीशी वाटते. भारतात सुमारे एक कोटी निर्वासित आले. यातील सुमारे ८० लाख हिंदू होते हेही आता सर्वांना माहीत झाले आहे. भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करणे हे एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्वासित पाठविण्याचे मुख्य कारण होते. (पूर्व बंगाल संपूर्ण निहिंदूमय करणे व पूर्व बंगालच्या लोकसंख्येचे प्रमाण पश्चिम पाकिस्तानच्या लोकसंख्येएवढे कमी करणे ही दुसरी दोन कारणे होती.) एरवी या निर्वासितांचे अस्तित्वच नाकारण्याचे पाकिस्तानला प्रयोजन नव्हते. प्रथम अस्तित्व नाकारणे, नंतर केवळ वीसच लाख आहेत असा प्रचार करणे (८०.लाख हिंदूच या संख्येतून वगळले आहेत हे लक्षात घेण्यासारखे आहे. कारण २० लाख मुस्लिम निर्वासित होते.) आणि अखेरीला सर्वच खऱ्याखुऱ्या पाकिस्तानी निर्वासितांना आम्ही आंतरराष्ट्रीय देखरेखीखाली परत घ्यायला तयार आहोत असे जाहीर करणे, या बदलत्या भूमिका आंतरराष्ट्रीय जनमताच्या दडपणाच्याच द्योतक होत्या. सर्वच निर्वासितांना परत घ्यायला तयार आहोत असे म्हटले तरी सर्व निर्वासित पाकिस्तानात जाणार नाहीत हे पाकिस्तानला माहीत होते. अत्याचाराचे ताट आपल्यापुढे वाढून ठेवले आहे ह्या जाणिवेमुळे हिंदू तरी परत जाणे शक्यच नव्हते आणि अशा रीतीने आम्ही सर्वांना परत घ्यायला तयार आहोत, सर्व आले नाहीत हा आमचा दोष ठरू शकत नाही असे म्हणून भारतावर ८० लाख माणसांचा बोजा टाकून मोकळे होण्याची युक्ती पाकिस्तान शोधीत होते.

 या युक्त्या न ओळखण्याइतके भारतीय नेतृत्व दूधखुळे नव्हते. पाकिस्तानच्या या अरेरावीला, अमानुष अत्याचाराला सर्वच बड्या राष्ट्रांनी सतत पाठिंबा दिला. (यात सोव्हिएत

पाकिस्तानची उद्दिष्टे /११५