पाकिस्तानच्या स्थापनेपासून भारतविषयक धोरणाचे एक सुसंगत सूत्र पाकिस्तानच्या वागण्यात दिसून येते. मी आधीच म्हटल्याप्रमाणे भारत-पाक-संबंधांचा इतिहास जीनांनी घालून दिलेल्या चौकटीत घडत गेलेला आहे. वरवर भारताबरोबर मैत्रीचे संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या अटी घालावयाच्या आणि या 'सन्माननीय' पातळीवर भारत तडजोड करायला तयार नाही म्हणून वाद चालू आहे असे भासवावयाचे, हे पाकिस्तानी राजनीतीचे प्रमुख सूत्र होते व आहे. हिटलरचे वर्तन आणि सदिच्छेची निवेदने यांचा बारकाईने अभ्यास करणाऱ्याला पाकिस्तानच्या प्रचारयंत्रणेने भारताबरोबर सदिच्छेचे संबंध ठेवण्याच्या वारंवार व्यक्त केलेल्या निवेदनांचा अर्थ नीट लागू शकतो. हिटलर ब्रिटिशांना एकीकडे सदिच्छेचे आवाहन करीत होता, त्याच दिवशी त्याने आपल्या सैन्यदलाला इंग्लंडवर हल्ला करण्याचा आदेश दिला होता. सोव्हिएत रशियाशी मैत्रीचा करार करीत असतानाच 'बोल्शेव्हिक रशिया नष्ट करणे माझे कर्तव्य आहे' असे तो मुसोलिनीला पत्र लिहून गुप्तपणे कळवीत होता. जीनांपासून लियाकत अलीखान, आयूबखान किंवा याह्याखान यांचे भारतविषयक राजकारणाच्या डावपेचाचे प्रयत्न समजून घेण्यासाठी हिटलरच्या तंत्राचा अभ्यास उपयोगी पडतो. (आगाखानांनी आपल्या आत्मचरित्रात जीनांची मुसोलिनीशी तुलना केली आहे आणि जीनांचे एकेकाळचे खासगी चिटणीस एम.आर.ए. बेग आपल्या "In Different Saddles" या पुस्तकात जीनांना नेहमी सर्वाधिकार हवे असत, मी करीन ते झाले पाहिजे असा त्यांचा खाक्या होता असे म्हटले आहे. (पृ. १५४.)) भारताबरोबर मैत्रीचे धोरण आम्ही ठेवणार आहोत असे जाहीर निवेदन केल्याच्या दिवशीच भारतातील संस्थानांना फुटून निघण्यास उत्तेजन देऊन जीना