पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मानतात त्याप्रमाणे शारदा आत्महत्या करायला नदीवर गेलेलीच नाही. तिला पहाटेच एक स्वप्न पडते. या स्वप्नात ती नदीवर आत्महत्या करायला जाते आणि तिथे येऊन तिला कोदंड सोडवतो व तिचे पाणिग्रहण करतो. हे पहाटेचे पडलेले स्वप्न खरे होणार की काय, ही परीक्षा पाहण्यासाठी शारदा नदीवर गेली आहे. कोदंडाशी लग्न होण्यापूर्वीच शारदेने मनाने त्याला वरले आहे. शारदेची इच्छा आता अनुरूप वराशी लग्न व्हावे इतकीच राहिलेली नसून ती मनाने सर्वस्वी कोदंडाची झालेली आहे. तिला आता कोदंडाखेरीज दुसरा वर मान्य नाही. या संदर्भात नदीवर जाणाऱ्या शारदेला जीव देता येणे शक्य नव्हते. नाटककाराला शारदेचे प्रेमनिवेदन आणि कोदंडाचा प्रीतिस्वीकार घडवून आणायचा आहे. त्यासाठी हा प्रसंग आलेला आहे. नाटककाराने शारदेचे लग्न आरंभापासूनच कोदंडाशी ठरविलेले आहे. त्यात बदल करणे शक्य नव्हते.

भुजंगनाथला हास्यास्पद बनवले
 एकदा नाटक सुखान्त करायचे हे ठरल्यामुळे आता देवल निश्चित झालेले होते. त्यांनी मनाशी ठरविलेली खलपात्रे कुट्ट काळ्या रंगात चितारण्यासाठी ते मोकळे होते, कारण हा व्यक्तिरेखांचा भडकपणा सुखान्त नाटकाच्या प्रकृतीला मानवणारा आहे. त्या दृष्टीने त्यांनी शारदेचा पिता कांचनभट संपूर्णपणे द्रव्यलोभी आणि निष्ठुर असा रंगवला. आपण म्हाताऱ्याला मुलगी देतो आहो याबाबतची वधूपित्याला स्वाभाविक असणारी खंत या व्यक्तिरेखेत संपूर्णपणे अनुपस्थित आहे. देवलांनी भुजंगनाथ पंचाहत्तर वर्षांचा केला; पण इतके पुरेसे न वाटल्यामुळे त्याला अधिक घृणास्पद करण्यासाठी तो त्यांनी चिक्कू, रंगेल, भोगपिपासू, लंपट, उतावळा, भित्रा अशा अनेक दुर्गुणांनी भरून टाकला आहे. सुदाम सावकारसुद्धा केवळ म्हातारा करून देवलांचे समाधान नव्हते. तो त्यांनी कुरूपही केला आहे. खलपात्रे घृणास्पद वाटावीत म्हणून कुरूप, दुर्गुणी करण्याची पद्धत परंपरेने चालत आलेली जुनीच पद्धत आहे. रंगभूमीवरील भुजंगनाथाचा प्रत्येक रंगेल उद्गार त्याच्याविषयी घृणाच वाढवतो. ती वाढावी, भुजंगनाथ हास्यास्पद ठरावा याची काळजी देवल घेतात. आपल्या नाट्यपरिणामासाठी सर्व वास्तवता गुंडाळून ठेवून बीभत्स हे विनोदी आहे असे दाखविण्यास देवल कचरले नाहीत. त्यासाठी त्यांनी लग्नाआधीच शारदा व

देवलांची शारदा / २७