पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रतिनिधी नाही. अशा घटना घडत नाहीत असे कुणीच म्हणणार नाही. पण अपवादभूत घटना म्हणजे समस्येच्या प्रातिनिधिक घटना नसतात. कांचनभर मुलीचे लग्न मोडले म्हणून वेडा होत नाही, तो हुंडा बुडाला म्हणून वेडा होतो. या वेडेपणाच्या भरातसद्धा आपला मुलगा जयंत हा जर मुलगीच असता तर त्याचेही पाच हजार रुपये मिळाले असते अशी कल्पना करतो. जवळ पैसे असूनही आपल्याला मुलीच व्हाव्यात, मुलगा असू नये, सर्व मुली म्हाताऱ्यांना द्याव्यात आणि प्रत्येकीचे पाच हजार रुपये उभे करावेत अशी आकांक्षा असणारा वधूपिता विषम-विवाहाच्या परिस्थितीतील वधूपित्यांचा प्रतिनिधी होऊ शकणार नाही, हे उघड आहे.

सामाजिक समस्येचे चित्रण करणे हा हेतूच नाही
 शारदेत देवलांनी जो प्रश्न चित्रित करण्यासाठी निवडला आहे, त्या सामाजिक प्रश्नावरील देवलांची पकड किती ढिली आहे व सामाजिक प्रश्न समजून घेण्याच्या देवलांच्या मर्यादा किती मोठ्या आहेत, याचे थोडेसे भान या विवेचनावरून होण्यास हरकत नसावी. खरे म्हणजे बाला-जरठ विवाहावरील नाटक शोकान्त होणे अपरिहार्य होते. ही अपरिहार्यता आजच्या टीकाकारांना जशी जाणवते, तशी देवलांना जाणवलेली दिसत नाही. 'शारदेला' प्रस्तावना लिहिणाया हरिभाऊ आपट्यांनाही या ठिकाणी शोकान्त नाट्याची अपरिहार्यता जाणवलेली होती असे प्रस्तावनेवरून वाटत नाही. नव्या समीक्षकांना ही अपरिहार्यता जाणवते. तिच्या संदर्भात कधीकधी असा प्रश्न विचारला जातो की, पाचव्या अंकाच्या दुसऱ्या प्रवेशात शारदा जीव देण्यासाठी नदीकाठी जाते, या ठिकाणी शारदा नदीत जीव देते असा शोकपर्यवसायी शेवट 'शारदे' च्या संदर्भात स्वाभाविक व शोभून दिसणारा झाला नसता काय? मला वाटते, हा प्रश्न विचारणेच भाबडेपणाचे आहे. 'शारदा' हे नाटक सामाजिक समस्या चित्रित करणारे वास्तववादी नाटक आहे असे गृहित धरूनच हा प्रश्न विचारला जातो. माझा मूळ गृहिताशीच मतभेद आहे.
 जर 'शारदा' नाटक समस्याप्रधान वास्तववादी नाटक असते, तर त्याचा शेवट शोकपर्यवसायी होणे अपरिहार्यच ठरले असते. पण आहे या अवस्थेत 'शारदेची रचना समस्याप्रधान नाटकाची नाही. नवतरुणीचे किंवा बालिकेचे

२० / रंगविमर्श