पान:युगान्त (Yugant).pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२२ / युगान्त

दोन्ही बाजूंनी भीष्म एक अडचणच होऊन बसला होता.
 तिसऱ्या दिवशी कृष्ण रथातून उडी टाकून सुदर्शन हाती घेऊन धावला, हे प्रकरण मागाहून घुसडल्यासारखे वाटते. नवव्या दिवशी तो चाबूक घेऊन धावला, ते प्रकरण योग्य ठिकाणी आले आहे व सर्व प्रसंगही महाभारताच्या पद्धतीने रंगवलेला आहे. थोडक्यात, त्या वेळच्या परिस्थितीला अनुरूप असा. तिसऱ्या दिवशीचा प्रसंग काव्यमय, अतिशयोक्त व कृष्णाचे देवपण वर्णन करण्यात बराच भाग खर्च केलेला असा आहे. बरे, कृष्ण एवढा निकरावर आला, पण अर्जुनावर त्याचा परिणाम झाला नाही, असे म्हणावे लागते. कारण तो भीष्माविरुद्ध उभा राहिला, तो तेथून सहाव्या दिवशी ! ही विसंगती नवव्या दिवशीच्या प्रसंगाने राहत नाही. मेल्याशिवाय गत्यंतर नाही, हे भीष्माला समजते. मारण्यास उभे राहिलेच पाहिजे. हे अर्जुनाला उमजते. दहाव्या दिवशी भीष्म पडतो.
 सर्व भीष्मपर्वच मोठे चमत्कारिक आहे. सुरवातीला भीष्म सेनापती झाल्यावर सर्व मिळून भीष्माला संभाळा, अशी आज्ञा दुर्योधनाने दिली.
 लढाईची जी वर्णने आहेत, त्यांवरून असे दिसते की, एका योद्ध्याचे दुसऱ्याशी असे एकास एक युद्ध जसे होत असे, त्याचप्रमाणे बऱ्याच योद्ध्यांचा समूह मिळूनही युद्ध होई. मुख्य लढणारे योद्धे दोन रथांत असत, आणि त्यांना संभाळणारे इतरही पुष्कळ असत. उदाहरणार्थ, शिखंडी लढत असताना त्याच्या संरक्षणार्थ खालीलप्रमाणे व्यवस्था होती :
 अर्जुनाच्या रथाच्या डाव्या चाकाशी युधामन्यू होता; उजव्या चाकाशी उत्तमौजा होता; आणि स्वतः अर्जुन शिखंडीचे रक्षण करीत होता. त्याचप्रमाणे इकडे सर्वांनी मिळून भीष्माच्या रथाचे रक्षण करावे, असे दुर्योधनाने दुःशासनाला बजावले.