पान:युगान्त (Yugant).pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युगान्त/ ७

 ह्या प्रसंगापर्यंतचे भीष्माचे आयुष्य निरुपक्रोश, निरागस असे गेले होते. त्याच्यामुळे दुसऱ्या कोणाचे नुकसान झाले नव्हते. कोणाचा तळतळाट झाला नव्हता. तो ह्या प्रसंगाने झाला व पुढेही असे प्रसंग बरेच आले.
 लग्न झाल्यावर विचित्रवीर्य लौकरच मेला. मागे वंश न ठेवता मेला. स्वतःची मुले राज्यावर बसावी, ही सत्यवतीची इच्छा तर धुळीला मिळालीच; पण सबंध घराणेच नष्ट होण्याच्या मार्गाला लागले. तेव्हा तिने दीनपणे भीष्माची प्रार्थना केली की, ब्रह्मचर्याची शपथ सोड, राज्यावर बैस व कुरुवंशाचा उद्धार कर निदान ह्या तुझ्या भावजयींना संतती दे. भीष्माने ह्या सर्व गोष्टींस नकार दिला. सत्यवतीला कुंवारपणी झालेला मुलगा व्यास हाही विचित्रवीर्याचा भाऊच. म्हणून त्याच्या राण्यांचा दीर. तेव्हा त्याच्याकडून संतती निर्माण करवावी, असे सत्यवतीने भीष्माच्या अनुमतीने ठरविले. "मुली, आज रात्री तुझा दीर येणार आहे," असे मोघमपणे बोलल्यामुळे भीष्म येईल की कुलातील दुसरा कोणता कुरुयोद्धा येईल, असा विचार करीत असलेल्या थोरल्या राणीला एकाएकी एक काळा, लाल डोळ्यांचा, केसांच्या जटा असलेला असा पुरुष दिसला व ती बेशुद्ध पडली. ह्या संबंधापासून निपजलेला मुलगा धृतराष्ट्र हा जन्मांध झाला. म्हणून दुसऱ्या राणीकडे व्यास गेला. त्याचे रूप पाहून ती भीतीने पांढरी पडली व तिला एक पांढरा-फटक मुलगा झाला. तो पांडू. त्या दोघी राजघराण्यात वाढलेल्या क्षत्रिय बायांना केवढी घृणा उत्पन्न झाली, हे पुढील गोष्टींवरून स्पष्ट दिसते. तिसऱ्या वेळेला ह्या भयंकर, कधी केस न विंचरलेल्या ब्राह्मणाला पाठवणार असे कळले मात्र, त्यांनी आपल्याऐवजी आपल्या दासीलाच त्याच्या स्वागताला उभी केली. तिला मुलगा झाला, तो विदुर.