पान:युगान्त (Yugant).pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अठरा / युगान्त

आला नसता. पण ज्या प्रकरणावर टीका लिहिल्या आहेत. ते सबंध प्रकरणच नसावे, म्हणजे शारदादि पोथ्यांच्या (- ज्यांचा काल दुदैवाने माहीत नाही, -) जुनेपणाबद्दल पुरावा मिळतो.
 आंध्रात वादिराज नावाच्या कवीने ह्याच सुमारास तेलुगू भाषेत महाभारताचे भाषांतर मुळातील श्लोक न वगळता केले आहे. त्याही भाषांतराची छाननी करून वादिराजापुढे कोणती प्रत असावी, ह्याची छाननी झाली.
 महाभारत-ग्रंथ जावामध्ये १५००च्या सुमारास गेला व तेथे त्याचे तिकडील भाषेत भाषांतर झाले. अधूनमधून मूळ संस्कृत श्लोकांचे व श्लोकार्थांचे बरेच भ्रष्ट असे उतारे त्यांत आहेत. ह्या उताऱ्यांचाही तुलना करताना फार उपयोग झाला. पुष्कळदा जुना संस्कृत शब्द न कळल्यामुळे जेथे नवा शब्द देवनागरी आवृत्त्यांत घातलेला आहे, तेथे जावा-आवृत्तीत जुनाच शब्द सापडला आहे.
 ह्या तीन ग्रंथांखेरीज महाभारतावरील टीकाकारांच्या टीकांचाही फार उपयोग झाला आहे. ते टीकाकार पुढीलप्रमाणे : देवबोध- विमलबोध- सर्वज्ञ - नारायण - अर्जुनमिश्र- नीलकंठ.
 देवबोधाची टीका 'ज्ञानदीपिका' या नावाची आहे. देवबोध इ.स.१०००-११००च्या सुमाराचा असावा. सर्वांत जुना टीकाकार, तसाच अतिशय विद्वान, म्हणून त्याची ही टीका फार उपयोगी पडली. विमलबोधाची टीका 'दुर्घटार्थप्रकाशिनी' किंवा 'विषमश्लोकी' नावाची आहे. काल नक्की नाही. सर्वज्ञ- नारायणाची टीका 'भारतार्थप्रकाश' नावाची आहे. काल सुमारे इ. स. ११००. अर्जुनमिश्राच्या टीकेचे नाव 'भारतार्थप्रदीपिका. 'काल सुमारे इ. स. १४००. नीलकंठाची टीका 'भारतभावदीप' नावाची व तिचा काल सुमारे इ. स. १७०० ह्याची माहिती सर्वांत जास्त. हा गोदावरी तीरावरील कोपरगावचा राहणारा. जातीने ब्राह्मण. बाप गोविंदसूरी व आई फुल्लाम्बिका. देवबोधाच्या टीकेत बरीच प्रकरणे नाहीत. ती