Jump to content

पान:युगान्त (Yugant).pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युगान्त / सतरा

जुळती आहे. एवढेच नव्हे, तर दक्षिणेकडील मल्याळी आवृत्तीही बऱ्याच बाबतींत शारदेशी जुळते. म्हणजे कधीतरी जुन्या काळी दक्षिणेकडे जी आवृत्ती गेली, व जिच्यापासून पुढे मल्याळी आवृत्ती निघाली, ती उत्तरेकडच्या आवृत्तीपेक्षा फार निराळी असावी. तीत भर पडून मैथिली वगैरे आवृत्त्या निघाल्या व सारखी भर पडपडून शेवटी देवनागरी आवृत्त्या निघून मूळ भारताला 'शतसाहस्त्री संहिता' असे नाव मिळाले, प्रत्येक गटाचे काही विशेष आहेत. उत्तरेकडच्या आवृत्तींत नसलेला व ग्रंथ व तेलुगू या आवृत्तीत आलेला एक विशेष म्हणजे एका विशिष्ट प्रकारचा नीतिबाजपणा. उत्तरेकडच्या आवृत्तीत दुष्यन्त- शकुन्तला, ययाति- शर्मिष्ठा ह्यांचे लग्न झालेले नाही, हे स्पष्ट आहे. दक्षिणेकडे ह्या लग्नसमारंभाचा व ब्राह्मणांना दिलेल्या दक्षिणेचाही उल्लेख आहे. एवढेच नव्हे. तर सत्यवतीचे व पाराशराचेही मोठ्या समारंभाने लग्न लावून दिलेले आहे! देवनागरी लिपीतून असलेली पण शारदा, K व नेपाळी यांमध्ये नसलेली अशी प्रकरणे म्हणजे कणिकनीती, दुर्वासाने हजारो शिष्यांसह वनात जाऊन पांडवांकडून जेवण मागणे, व द्रौपदीचा धावा आणि कृष्णाने वस्त्रे पुरवणे. शिवाय, लहान-लहान प्रकरणे तर कितीतरी आहेत. सर्वांत मोठ्या पोथीत शतसहस्त्र नाहीत, पण ९५५८६ श्लोक आहेत, तर संशोधित आवृत्तीत ८९१३६ राहिले आहेत.
 प्रत्यक्ष महाभारताच्या पोथ्यांखेरीज सापडतील तशी इतरही प्रमाणे ह्या आवृत्तीसाठी उपयोजिली आहेत. त्यांतील एक म्हणजे महाभारताचा संक्षेप करून लिहिलेला 'भारतमंजिरी' नावाचा ग्रंथ. हा क्षेमेंद्राने सुमारे इ. स. ११०० ते १२०० दरम्यान लिहिला आहे. जेथे श्लोक-न्-श्लोक तपासला जातो, तेथे अशा ग्रंथांची उपयुक्तता मर्यादितच. पण काही बाबतींत तो उपयुक्त ठरला. क्षेमेंद्राने महाभारतातील आख्यानांची जंत्री दिली आहे. तीतही 'कणिकनीती' हे प्रकरण नाही. काही श्लोक नसते. तर त्यावरून कयास बांधता