पान:मृच्छकटिक.pdf/10

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ९ )

ओढीत म्हणू लागला, "आतां कुठे जाईल वसन्तसेना ! " परंतु अंधारांत शकाराच्या हातीं जिची वेणी लागली ती वसन्तसेना नव्हतीच. ती होती बळी टाकण्यासाठी बाहेर आलेली रदनिका. विझलेला दिवा लावून आणण्याकरिता मैत्रेय घरांत गेला होता. तो दिवा घेऊन बाहेर येतों तों रदनिका मदतीसाठीं ओरडत असलेली त्याने ऐकले. कारण अंधारांत आपली वेणी कोण आणि कां ओढीत आहे हे तिला कांहीं समजतच नव्हते. उजेडांत पाहिले तेव्हां मैत्रेयाच्या लक्षांत खरा प्रकार आला. लगेच तो आपल्या हातांतील सोटा सरसावून शकारावर धांवला. “चारुदत्त पैशानें गरीब झाला म्हणून त्याच्या माणसांचा असा अपमान आम्ही कधीच सहन करणार नाहीं," तो उसळून म्हणाला.

 परंतु एवढ्यांत विट मध्ये पडला आणि त्याने मैत्रेयाकडे क्षमायाचना केली. शकाराला मात्र वाटत होते की, वसन्तसेना अशी अकस्मात चारुदत्ताकडे निसटू शकली याला कारण हा मैत्रेय असला पाहिजे. म्हणून त्याने तेथून निघून जाण्यापूर्वी मैत्रेयाकडे पाहात धमकी दिली की, वसन्तसेना आपल्याला परत मिळेपर्यंत आपण चारुदत्ताला शत्रु समजू.

 वसन्तसेना चारुदत्ताच्या घरांत आली आणि एका भितीच्या आडोशाला झाली. रदनिकेची वेणी अंधारांत शकाराने ओढल्यामुळे चारुदत्ताच्या घरापुढे जो गलबला माजला त्यामुळे चारुदत्त काय झाले म्हणून पाहाण्यासाठी दाराकडे आला. हवेत फार गारठा होता आणि वारा