पान:मी भरून पावले आहे.pdf/132

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नव्हता. मीठ खायचं नाही आणि पाणी जास्त प्यायचं नाही. लिमिट होतं. एवढंच पाणी प्यायचं. लघवी जमा करायची रोज आणि ती तपासायला पाठवायची. नि मग ते बघायचे किती झाली, पुरी झाली की नाही. हे, ते आहे का? त्यात किती अंश युरियाचा आहे, वगैरे. त्याच्यावरनं कळायचं सगळं. दर दिवशी मी ते तपासून आणायला जायची. खूप माणसं आमच्याकडे यायची. दुपारची वेळ दलवाईंच्या विश्रांतीची. कारण सगळे आपापल्या कामावर जायचे. संध्याकाळी सगळे आले की मी भाकऱ्या भाजायचं काम करायची. काही तरी कालवण करायची. टेबलावर नेऊन ठेवायची. आणि सगळे जमले की माणसं बसायची. मग मी हातात प्लेटी द्यायची. थोडा थोडा भाकरीचा तुकडा अन् कालवण घालायची. 'मला जेवण जात नाही. माझ्याबरोबर तुम्ही खा', हे म्हणायचे. दुसऱ्यांना खायला घालायचा षौक फार होता त्यांना. काही दिवसांनी फिरायची त्यांना परमिशन मिळाली. तेव्हा ते गाडी पण चालवत होते. तिथल्या तिथे. एकदा तर खूप मोठा अॅक्सिडेंट झाला. वाचलो आम्ही. डॉक्टरनी त्यांना सांगितलं होतं का गाडी चालवत असताना इथं पोटाजवळ तुम्ही उशी ठेवायची. म्हणजे समजा ब्रेक लागला तर हँडल-बिंडल तुमच्या पोटावर बसता कामा नये. उशी असली तर डायरेक्ट ते बसणार नाही. म्हणून उशी ठेवून गाडी चालवायची. ते सकाळचे कुणाला तरी घेऊन मार्केटला जायचे. कोंबडी-बिंबडी घरी आणायची. हुशारी आली त्यांना. तब्येत सुधारली चांगली. तर जायचे, बाजार घेऊन यायचे. मस्त जेवायचे. सगळे मिळून खायचे. आमच्या घरी जे व्हायचं ते पवारांच्या घरी जायचं आणि पवारांच्या घरी जरा काही झालं की ते आमच्या घरी यायचं. आम्हांला दिल्याशिवाय त्या माणसानं कधी काही खाल्लं नाही. मग वहिनी असं सारखी विचारायची, 'काय दलवाईसाहेब, आज तुम्हाला काय करून देऊ?' तर हे म्हणायचे, 'आज मला थालिपीठ खायचंय, आज मला भजी खायचीत.' त्या बाई आपल्या हातांनी करून घालायच्या ह्यांना.' म्हणजे इतकं प्रेम. एकदा तर ह्यांची तब्येत बिघडली म्हणून यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलं. नंतर वहिनीला कळलं, वहिनी म्हणाली, 'आत्ता तर बरे होते. आत्ता काय झालं?' म्हणून ती बिचारी बघायला आली. बघायला आली तर यांनी ओळखलं नाही तिला. त्या म्हणाल्या, 'दलवाईसाहेब, मी काय आणू तुम्हांला खायला? भजी-बिजी आणू का?' तर हे माझ्या तोंडाकडे बघून मला विचारताहेत, ही कोणय ग? म्हणजे मध्ये क्षणभरच त्यांना असं झालं. त्या निघून गेल्यानंतर हे शुद्धीत आल्यानंतर मी म्हटलं, 'वहिनींना खूप वाईट वाटलं

मी भरून पावले आहे : ११७