पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/29

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्थानिक परिस्थितीनुसार जे काही करता येइल ते करा पण कोणत्याही स्थितीत अन्नधान्याचे पीक आपल्य गावापुरतेच घ्या. अन्नधान्य वाटेल तितके पिकवत सुटलात तर हा लढा चालवताच येणार नाही. उरलेल्या जमिनीत दसरे काहीच करता येत नसेल तर एक वर्षे ती पड ठेवा. इतर कारखान्यातील यंत्र बंद ठेवली तर गंजून जातात पण आपलं हे यंत्र एखाद वर्ष बंद ठेवलं तर अधिक उत्पादनक्षम होतं. जमिनीला थोडा दम खाऊ द्या. हे साधन म्हणणे आपल्या हातातील केवढी मोठी ताकद आहे!
 सरकारने सांगितले अधिक धान्य पिकवा. ते ऐकून आम्ही वर्षानुवर्षे आमच्या काळ्या आईचे शोषण केले, झाडे तोडली, गवताची करणेसुद्धा शेतीखाली आणली. दरवर्षी अधिकाधिक पिकं घेऊन ती सुद्धा दमली. तिला जास्त खत लागायला लागलं, औषधं जास्त लागू लागली त्यामुळे शेतीमालाचा उत्पादनखर्च वाढत राहिला आणि किमती मात्र पडतच राहिल्या, यामुळे या शर्यतीत आपण जिंकणे शक्य नाही. तेव्हा जमिनीतून दसरं काही काढणं शक्य नसेल तर ती वर्षभर पड ठेवा पण गावाच्या जरुरीपेक्षा जास्त धान्य पिकवू नका.
 हा या वर्षाचा कार्यक्रम आहे. सुरुवातीला रब्बीचे हाती आलेले धान्य बाजारात विक्रीसाठी बिलकूल आणावयाचे नाही आणि खरिपाच्या हंगामात फक्त गावापुरते अन्नधान्य पिकवायचे.
 'स्वातंत्र्या'सारखी मौल्यवान गोष्ट मिळविण्यासाठी आपण हे आंदोलन पुकारले आहे. त्यात विनासायास यश मिळेल असे मानणे चूकच आहे. अनेक अडचणी आपल्यापुढे उभ्या राहतील; पण आता आपण 'आपण' आहोत. आपल्यातील कणीही आता 'एकटा नाही. आपण सर्व मिळून संघटनेच्या अडचणींना सामोरे यायला हवे.
 पहिली अडचण बऱ्याच लोकांच्या बाबतीत निर्माण होईल ती म्हणजे कर्जफेडीची. आपल्याला इंडियाची कर्ज फेडायची नाहीत असे नाही. आम्हाला कर्जमाफीची भीक नको. पण जोपर्यंत शेतकरी स्वतंत्र होत नाही, त्याला आपल्या शेतीमालाचा भाव उत्पादन-खर्चावर अधारित ठेवण्याचा अधिकार मिळत नाही, तोपर्यंत शेतकरी कर्ज फेडणार नाहीत. 'पुढाऱ्यांप्रमाणेच कर्जवसुली अधिकाऱ्यांना परवानगीशिवाय गावात प्रवेश करण्यास बंदी आहे.' असा फलक प्रत्येक गावाने आपल्या वेशीवर लावावा. तरीही वसुली अधिकारी गावात आल्यास सर्व गावकऱ्यांनी सत्याग्रहाचा मार्ग वापरून त्यांना वसुली किंवा जप्ती करण्यास बंदी करावी.
 दुसरी अडचण म्हणजे गावामध्ये ज्याची स्वतःची पुरेशी ज्वारी नाही, धान्य

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २९