पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/18

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अंतुल्यांच्या बाजूनेही बोललो नाही आणि विरोधातही बोललो नाही; पण ऊसभावासंबंधी आमच्या वाटाघाटी झाल्या त्या वाटाघाटीत आम्ही स्पष्टपणे सांगितले होते, की आमच्या उसाच्या भावासंबंधी मागण्या केंद्र सरकारकडून मान्य करून आणल्याखेरीज आम्ही ऊसबिलातून कोणतीही कपात मान्य करणार नाही. तेव्हा, अंतुल्यांनी आणि साखर कारखान्यांच्या अध्यक्षांनी केलेली कपात आम्हाला मान्य नाही, आमचे पैसे आम्हाला परत करा. आज उसाच्या एकेका टनामागे ५ रुपये हिशोबात धरलेलेच नाहीत. कोणी म्हणे, उसाच्या वाहतुकीचा खर्च लक्षात घ्यायचे आम्ही विसरूनच गेलो आणि हे चेअरमन म्हणे! आमच्या वाटाघाटींच्या शेवटी अंतुले मला म्हणाले की, 'शेतीमालाच्या भावावर तुमचं माझं एकमत आहे. मी दिल्लीला जातो, वेळ पडली तर पंतप्रधानांशी बोलतो आणि सगळं काही मंजूर करून आणतो. म्हणजे अंतुल्यांना शेतकऱ्यांचा कळवळा आहे, त्यांनी शेकऱ्यांचे म्हणणे मानले; पण दिल्लीला त्यांच्या हाती काही लागले नाही. याचा अर्थ काय? अर्थ सरळ आहे की अंतुले शेतकऱ्यांबद्दल कळवळा बाळगतात पण इंदिराबाई बाळगत नाहीत. हे खरे असेल तर अंतुल्यांनी जाहीर कबुली द्यावी की मी शेतकऱ्यांच्या बाजूचा आहे; पण बाई नाहीत. असे ते म्हणाले तर एक दिवससुद्धा खुर्चीवर राहणार नाहीत. दिल्लीहून काही आणले नाही आणि ऊसबिलांतून कपात करायला मात्र सुरुवात! हे आम्ही कदापि मानणार नाही.
  आपल्या गेल्या वर्षीच्या आंदोलनाचा धसका घेऊन सरकारने आणखी एक युक्ती केली. सरकारने साखर आयात केली. आयात साखर बाजारात आल्यामुळे साखरेचे भाव खाली आले. जी साखर ७ रुपये किलोने जात होती ती आता साडेचार साडेपाच रुपये किलोने विकली जाऊ लागली. साखरेचा भाव एक रुपयाने खाली गेला म्हणजे शेतकऱ्याचे टनाला २५ ते ३० रुपयांनी नुकसान होऊ लागले आहे. अशीच परिस्थिती जर राहिली तर तुम्ही ३०० रुपयांचा भाव विसरा, १० टक्के उताऱ्याला २५० रुपयेसुद्धा मिळायचे नाहीत. उसाची एवढी भयानक परिस्थिती आहे.
  एवढेच नव्हे तर, दिल्लीच्या अन्न मंत्रालयाचे अधिकारी साखर संघाकडे गेले आणि त्यांना म्हणाले की, रेशनवर वाटायला आमच्याकडे पुरेशी साखर नाही. तुमच्याकडे फ्री सेलची साखर जास्त आहे ती आम्हाला उसनी द्या.' साखर संघाचे लोक त्यांना म्हणाले की, 'अहो तुम्ही गेल्या वर्षीही अशीच साखर घेतली होती; ९५ हजार टन. तुम्ही उसनी घेता भाव जास्त असेल तेव्हा आणि परत करता भाव कमी असेल तेव्हा. असं आम्हाला नुकसानीत टाकू नका. असंमाझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १८