पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/14

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कोणत्याही शेतकऱ्याची नाही. इथे जमलेल्या शेतकरी मंडळींत पेठ, इगतपुरी इत्यादी ठिकाणची मंडळी आहेतच, पण रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील भाताच्या भागातील अभ्यास केलेली मंडळीही हजर आहेत. भाताचा उत्पादन खर्च प्रतिकिलो २ रुपये ५० पैशांच्या खाली नाही आणि सरकारने भाव जाहीर केला आहे प्रतिकिलो १ रुपया १५ पैसे. भात विकत घेऊन खाणे परवडते असा तेथील शेतकऱ्यांचा अनुभव आहे; पण करणार काय? शेत आहे म्हणून भात पिकवायचा, एवढेच. आम्हाला, वाटाघाटींच्या वेळी तिडके साहेबांनी सांगितले की, 'महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे भाताला १७६ रुपये क्विटल भाव मिळावा अशी शिफारस केली आहे. लगेचच दुसरे दिवशी दिल्लीला केंद्रीय कृषीमंत्री राव वीरेंद्र म्हणाले की, 'महाराष्ट्र सरकारकडून भाताच्या भावाबद्दल आम्हाला काहीही शिफारस आलेली नाही.' त्यांनी ११५ चाच भाव जाहीर केला. आता महाराष्ट्र सरकार काय भाव देणार आहे, कोणास ठाऊक.
  दुधाची परिस्थितीही अशीच. दूधभाताचा लढा आम्ही गेल्या वर्षी स्थगित केला. आपल्याला गेल्या वर्षी दोन वेळा भाववाढ मिळाली. जवळजवळ ६० ते ८० पैशांचा दर लिटरमागे फरक झाला. यंदा दुधाच्या बाबतीत पावसाने थोडा दगा दिला. दूधभाताच्या शेतकऱ्यांनी आम्हाला विनंती केली की, 'सध्या जरी थोडा कमी भाव मिळाला तरी चालेल. आज दोन पैसे मिळाले तर ते आम्हाला हवे आहेत. म्हणून आम्ही भावाची ती तडजोड मान्य केली; पण २९ जुलैला अंतुले सरकारने आम्हाला आश्वासन दिले होते की, 'दुधाचा भाव ठरवण्याकरिता एक समिती नेमणार आहोत आणि त्या समितीचा अहवाल सहा महिन्यांच्या आत दिला जाईल.' आज दोन महिने उलटून गेले तरी अजून त्यांनी ती समिती नेमली नाही. आता आमच्या असे लक्षात आले आहे की आपण इथे शासनाला गेल्या डिसेंबरमध्ये जी चपराक दिली तिचा परिणाम कमी झाला आहे; ते विसरलेत.
 आज एकाने शिवनेरी नावाच्या दैनिकातील लेख दाखवला. लिहिणाऱ्याने त्यामध्ये असे लिहिले आहे की, 'अंतुलेंनी आपल्या कार्यक्षमतेने शेतकरी संघटना भुईसपाट करून टाकली. शेतकरी संघटना किती भुईसपाट झाली त्याचा पुरावा इथे तुमच्या विराट उपस्थितीने दिला आहे आणि येत्या दोन महिन्यांत ते जगालाही दिसणार आहे. सपाट कोण झाले ते त्या दैनिकाच्या संपादकांनी निदान आज सकाळची वर्तमानपत्रे उघडून तरी पाहायला हवे.


 आता मी कांदा आणि ऊस या विषयाकडे येतो. कांदा आणि ऊस ही आपल्या महाराष्ट्रातील महत्त्वाची पिके आहेत. आता मी जे बोलणार आहे ते अत्यंत जबाबदारीने बोलणार आहे. माझी ही माहिती खोटी आहे असे ज्यांना

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १४