पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/८७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पटलं आहे तेवढे शेतकरी एका बाजूला केले तर जवळजवळ सगळीच माणसं बळिराज्याला म्हणजे खुल्या अर्थव्यवस्थेला विरोध करायला समोर येत आहेत. याबद्दल आपण सेवाग्रामच्या मेळाव्यात ऊहापोह केला. सगळे संघटित कामगार, सगळे सरकारी नोकरदार, सार्वजनिक क्षेत्रातील नोकरदार, दलाली करून लोकांची कामं करून, त्यावर पोट भरणारे राजकीय पुढारी आणि ज्यांनी लायसेन्स-परमिट मिळवून स्वतःची कारखानदारीची मक्तेदारी व्यवस्था बनवली असे कारखानदार हे सगळेच लोक खुली अर्थव्यवस्था येत आहे म्हटल्यावर बेचैन झाले आहेत. कारण, कामगार, नोकरदार, राजकीय पुढारी आणि मक्तेदार कारखानदार या तीन गटांच्या लोकांनी नवीन व्यवस्थेला विरोध करायला सुरुवात केली. या तिघांचा विरोध इतका प्रबळ आणि केंद्रातील शासनव्यवस्था थोडी डळमळीत त्यामुळे ज्या तऱ्हेने आणि ज्या गतीने खुली अर्थव्यवस्था देशात येईल असं वाटलं होतं किंवा पंतप्रधानांनी आणि वित्तमंत्र्यांनी जागतिक बँकेला व आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला ज्या गतीने ही व्यवस्था आणू म्हणून सांगितलं होते त्या गतीने काही ही व्यवस्था देशामध्ये येताना दिसत नाही आणि गव्हाची आयात व शेतकऱ्यांच्याबद्दल जी काही निर्बंधात्मक धोरणं आखली जात आहेत ती पाहता खुली अर्थव्यवस्था आली तरी ती शेतकऱ्यांपर्यंत यायची नाही; फार फार तर ती कारखानदारापर्यंत पोहोचेल अशी धास्ती तेव्हापासून आपल्याला वाटते आहे.
 ज्या ज्या कारखानदारीकरिता परवाना घ्यायची गरज नाही असे सकरकारने जाहीर केले आहे त्या कारखानदारीमध्ये शेतीसंबंधी कारखानदारी कोणती नाही. अगदी अलीकडे या प्रश्नांवर पुन्हा एकदा फेरविचार झाला तरीसुद्धा परवानामुक्त वाढीव यादीत साखर, अल्कोहोल, साखरेचे पदार्थ, दुधावरील प्रक्रियेसंबंधीचे पदार्थ यांच्या उद्योगांचा समावेश नाही.
 याच सुमारास आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली. अयोध्या प्रकरण. अयोध्या प्रकरणाचे विश्लेषण करण्याची ही जागा नाही; पण अयोध्या प्रकरणाचे आर्थिक परिणाम काय झाले याचा आढावा घेणे आवश्यक आहे.
 अयोध्या प्रकरणामुळे सगळ्या देशभर दंगे उसळले. तत्काळ प्रतिक्रिया म्हणून दंगे झाले तर एकवेळ समजण्यासारखं आहे; पण महिनाभराने पुन्हा एकदा मुंबईमध्ये हजारबाराशे माणसं मरण्याइतके आणि चार हजार कोटी रुपयांचं नुकसान होण्याइतके उग्र दंगे होत असले तर त्याचा अर्थ काय? जर का देशातलं शासन हे अशा तऱ्हेने दंगे परिणामकारकरीत्या थांबवू शकत नसतील तर त्याचा अर्थ काय? हे प्रश्न महत्त्वाचे आहेत.
 अयोध्याप्रकरणाचा परिणाम म्हणून काही गोष्टी ताबडतोब घडू लागल्या. अनिवासी

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ८७