पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/७८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 समस्या आणि सत्ता अद्वैत
 अयोध्या प्रश्न सोडवून समस्या संपतील? नाही संपणार. अयोध्येच्या ऐवजी नवीन वाद तयार करतील. कारण वाद तयार केला म्हणजे खुर्ची मिळते. खुर्ची मिळाली म्हणजे लायसेन्स द्यायला मिळतं, परमिट द्यायला मिळतं, परवानगी द्यायला मिळते, गॅसचं कनेक्शन पाहिजे असलं तरी देता येतं, टेलिफोन देता येतो, सोसायटी काढायची तरी देता येते, साखर कारखानाही देता येतो. म्हणून या सगळ्या ताकदीकरिता लोक रामाचं नाव घेतात, रहिमाचं नाव घेतात; उद्या आणखी कुणाचं घेतील.
 हा प्रश्न सोडवायचा मार्ग एकच आहे. अयोध्येचा प्रश्न सोडवून हा वाद संपणार नाही. काय करायला पाहिजे? लक्षात ठेवा, सत्तेचा हा जादूचा दिवा म्हणजे पाप आहे. जोपर्यंत हे पाप आहे तोपर्यंत सत्तेकरिता लालचावलेली सगळी माणसं काय वाटेल ते करायला तयार आहेत. त्या खुर्चीतली सत्ता काढून टाका. चेअरमनला चार हरामाचे पैसे कमावता येणार नाहीत अशी चोख व्यवस्था ठेवा, म्हणजे चेअरमन व्हायचा कोणी प्रयत्न करणार नाही. पंतप्रधान बनलं म्हणजे सगळी काही मौजच मौज आहे असं वाटायच्या ऐवजी पंतपधान म्हणजे मोठी जबाबदारी आहे; कोण करणार त्या फुकटच्या लष्करच्या भाकऱ्या भाजायचं काम? अशी जर का परिस्थिती झाली तर हिंदुस्थान वाचेल, तर अयोध्येसारखे नवे प्रश्न निर्माण होणार नाहीत, तर नवी अर्थव्यवस्था येण्यात अडथळे येणार नाहीत, तर शेतकऱ्याच्या घामाला दाम मिळणारी व्यवस्था येईल.
 थोडक्यात काय? या नेहरूव्यवस्थेने शेतकऱ्यांचं वाटोळ केलं.शेतकऱ्यांना लुटलं, कर्जात बुडवलं, देशालासुद्धा कर्जात बुडवलं, सोनंसुद्धा बाहेर देशात गहाण ठेवायला लावलं अशी परिस्थिती या नेहरूव्यस्थेने एका बाजूला आणली आणि म्हणून त्याचा निषेध करण्याकरिता आपण मुंबईला जाणार होतो.
 सरकार किमान असावे
 या सेवाग्रामच्या गांधीबाबाने आपल्याला सूचना दिली की अरे हा आजार इतका लहान नाही. तुम्हाला वाटतं त्यापेक्षा मोठा आजार आहे. हा नुसता नेहरू - अर्थव्यस्थेच्या निषेधाने बरा होणारा नाही. देश वाचवायचा असेल तर सगळं सरकार बदललं पाहिजे. सगळी घटना बदलली तर हे जमेल आणि घटना बदलायची म्हणजे काय करायचं? सरकारकडे फायद्याचं कलम ठेवायचं नाही. शेती कशी चालायची, अर्थव्यवस्था कशी चालायची, कारखाने कसे चालवायचे हे ठरवायचं काम सरकारचं नाही. सरकारचं काम म्हणजे कोणी चोरी केली त्याला पकडून आणा, कुणी खून केला त्याला पकडून आणा, परदेशातील कुणी

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ७८