पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/७७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विश्वविद्यालयांचे कुलगुरूसुद्धा त्याला वाकून सलाम घालतात.
 नेहरू - जादूच्या दिव्याचे जनक
 हा 'जादूचा दिवा' कुणी तयार केला. हा जादूचा दिवा नेहरूंनी तयार केला. दिल्लीमधील खुर्चीत इतकी काही ताकद ठेवली की ती खुर्ची ज्याला त्याला हवीहवीशी वाटते, हा 'जादूचा दिवा' आपल्या हाती लागावा असं वाटतं आणि मग तो हस्तगत करण्यासाठी लोक काय वाटेल ते करायला तयार होतात. आपल्या गावाचं उदाहरण घेतलं तरी समजू शकेल. दूध सोसायटीचा चेअरमन, चेअरमन झाल्यानंतर चार पैसे चांगले कमावतो म्हणून सोसायटीच्या निवडणुकीकरता लोक काय वाटेल ते करतात; याला पळव, त्याला पळव, सगळं काही करतात; पण त्याच्याऐवजी, दूधसोसायटीचा चेअरमन झाला म्हणजे दोन पैसेसुद्धा मिळत नाहीत, उलट प्रसंगी खिशातले चार पैसे काढून सोसायटीचं काम करायला लागतं अशी परिस्थिती असती तर निवडणुकीमध्ये कुणी आलंच नसतं, निवडणूक लढवायला. ज्यानं त्यानं दुसऱ्यालाच पुढे केलं असतं. लोक आज निवडणूक लढवायला का धावतात? तिथं गेल्यावर सगळं काही विनासायास मिळतं म्हणून धावतात. गावच्या दूधसोसायटीचं जे खरं तेच दिल्लिच्या खुर्चीचं खरं. या नेहरूव्यवस्थेने त्या 'जादूच्या दिव्या'ला इतकं काही आकर्षण तयार केलं आहे की तो मिळविण्याकरिता कोणी कोणी काय काय पापं केली याची यादी करायला बसलं तर दिवस दिवस लागतील.
 सत्तेसाठी कसलेच सोयरसूतक नाही
 १९५२ मध्ये इंदिरा गांधींनी निवडणुकीनं निवडून आलेलं केरळातलं कम्युनिस्टांचे सरकार पाडलं, पहिलं पाप. काश्मीरमधलं शेख अब्दुल्लांचं सरकार पाडलं, पंजाबमध्ये काँग्रेसचं राज्य टिकावं म्हणून भिन्द्रानवाल्यांना उभं केलं, ते इंदिरा गांधींनी केलं. निवडणुकीने आपल्या हाती सत्ता राहावी म्हणून राजीव गांधींनी शहाबानो प्रकरणामध्ये फेरफार केली, बोफोर्स प्रकरणात कमिशन खाल्लं. जनता दलाने हातामध्ये सत्ता यावी म्हणून 'मंडला'चा राक्षस उभा केला आणि उद्या अजून द्वारका, मथुरा, काशी मशीद असे किती राक्षस उभे राहणार आहेत कुणास ठाऊक?
 याचा अर्थ काय? याचा अर्थ राम महत्त्वाचा नाही; 'गर्व से कहो, हिंदू है।' म्हणणारांच्या मनामध्ये हिंदू धर्माचा गर्व अजिबात नाही. यांच्या मनात आहे खुर्चीवर जाऊन बसणे. कारण, त्या खुर्चीवर बसलं म्हणजे जादूचा दिवा हाती येतो आणि मग सगळी सुखं आपल्या हाती येतात. असा हा स्वार्थांधांचा खेळ नेहरूव्यवस्थेने शक्य झाला.

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ७७