पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/६५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रयत्न केला; पण दरम्यान सरकारच गडबडून गेलं आणि आज परिस्थिती अशी आहे की देशामध्ये सरकार खऱ्या अर्थाने अस्तित्वातच नाही. दहा वर्षांपूर्वी आपण जेव्हा आंदोलन सुरू केलं. तेव्हा शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळणार नाही अशी व्यवस्था करणार दुष्ट सरकार समोर होतं. आज स्थिती अशी आहे की तसा दुष्टपणा करण्यापुरतंही सरकार अस्तित्वात नाही. आज जे सरकार म्हणून आहे ते म्हणजे दिल्लीच्या खुर्चीवर बसविलेला गुळाचा गणपती आहे. त्यांनी शेतीमालाला भाव द्यावा म्हटले तरी तो देण्याची त्यांची ताकद नाही. आश्वासने खूप देतील पण त्यांचा खजिना रिकामा आहे. त्यांच्या खिशात रुपया नाही आणि खजिन्यात 'डॉलर'ही नाही. म्हणजे, सरकार नावाची गोष्टच आज देशात शिल्लक नाही.
 मग शेतीचं धोरण स्वीकारायचं कोणी? स्वीकारणाऱ्या दोघांपैकी राहाता राहिलो फक्त आपण, शेतकरी, म्हणून या प्रचंड मेळाव्यात आपण देशातल्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने सांगतो आहोत की देशाचं शेतीविषयक धोरण कसं असावं ते आम्ही सांगतो आहोत. आपण जी 'राष्ट्रीय कृषिनीती' सर्व शेतकऱ्यांच्या वतीने स्वीकारतो आहोत त्याला जे महत्त्व आहे, जी प्रतिष्ठा आहे ती दिल्लीतील गुळाच्या गणपती सरकारच्या लोकसभेने कितीही जाहीरनामे प्रसिद्ध केले तरी त्यांना मिळणार नाही.
 भारत दशक
 १९९० मध्ये त्यावेळचे पंतप्रधान श्री. विश्वनाथ प्रताप सिंगांनी लाल किल्ल्यावरून 'किसान दशका'ची घोषणा केली. आम्ही विचारतो, "किसान दशक जाहीर करणारे तुम्ही कोण?" उलट, आम्ही इथं जमलेले लाख लाख शेतकरी येती दहा वर्षे 'भारत दशक' म्हणून जाहीर करीत आहोत. पंतप्रधान दररोज रेडिओ व टेलिव्हिजनवर येऊन सांगतात की, "देश संकटात आहे, आर्थिक अडचणीत आहे, शेतकऱ्यांनी पुढे यावे आणि देशाला परकीय चलनाच्या संकटातून सोडवावे." आम्ही आज देशातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने त्यांना प्रतिसाद देतो आहोत. कारखानदारांचं कोडकौतुक संपलं असेल तर या देशातला शेतकरी देशाला परकीय चलनाच्या संकटातून सोडविण्यासाठी आपला निर्धार जाहीर करीत आहे. आम्ही देशाला वाचविण्यासाठी येती दहा वर्षे ही 'भारत दशक' म्हणून घोषित करीत आहोत.
 चौफेर शेती
 या 'भारत दशका'चा कार्यक्रम काय असेल? आपण शेतकऱ्यांनी काहीही करायचं ठरवलं की पूर्वी मध्ये मध्ये येऊन अडथळे आणणारं सरकार होतं तसं

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ६५