पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/६०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 हे सगळं कसं काय बसवायचं? मी आळंदीच्या बैठकीत एक वाक्य वापरलं ते मी तुमच्यासमोर वापरतो. परिस्थिती खूप बदलली आहे. १९७६ मध्ये मी हिंदुस्थानात आलो आणि शेती करायला लागलो आणि १९८० सालच्या परिस्थितीमध्ये शेतकरी संघटना निघाली, ८० मध्ये मी एकूण ११ वेळा तुरुंगात गेलो. आज ९१ मध्ये जर का मी हिंदुस्थानात परत आलो असतो, आजपर्यंत स्वित्झर्लंडमध्येच राहिलो असतो आणि जर का ९१ मध्ये परत आलो असतो तर शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी मी काय केलं असतं? मी असं म्हटलं की यावेळी शेतकरी संघटना काढली नसती, कदाचित, एखादी कॉर्पोरेशन (महामंडळ) काढली असती - शेतकऱ्यांच्या मालाची निर्यात आणि शेतकऱ्यांच्या मालाची प्रक्रिया व्यापकपणे करण्यासाठी; घरोघर करण्यासाठी. कापूस उत्पादक शेतकरी कापूस विकणार नाहीत. तो निदान रूई करून विकेल, जमलं तर सूत करून विकेल, जमलं तर आणखी कपडे विणून विकेल आणि जमलं तर तयार झालेले कपडे परदेशात जाऊन विकेल; पण कच्चा माल म्हणून बाजारपेठेत नेणार नाही.
 फळं पिकविणारे, डाळिंब पिकविणारे शेतकरी हे फळाची रास नेऊन बाजारात ओतून त्याचा चिखल झालेला यापुढे पाहणार नाहीत. त्याचे आवश्यक तर रस काढतील, त्याची वाईनसुद्धा करतील. वाईन करायला परवानगी नाही, कायद्याप्रमाणे. पण आम्ही त्यांना सांगितलं की हा शेतकऱ्यांचा हक्क आहे; त्याच्या शेतामध्ये तयार होणाऱ्या फळांची वाईनसुद्धा करण्याचा. तुम्ही पाहिजे तर साखर कारखान्यामधले अल्कोहोलचे कारखाने बंद करा. कारण ते अल्कोहोल पिऊन लोक गटारात पडलेले दिसतात, या वाईनने निदान तो तरी प्रकार होण्याची शक्यता नाही. सुधाकरराव नाईकांना मी सांगितलं की वसंतराव नाईकांना ती दारू चालू करून जे काही नुकसान केले ते दूर करायचं काम तुमचं आहे. शेतकऱ्याच्या मालावर, शेतकऱ्याच्या शेतामध्ये तयार होणाऱ्या वस्तूवर, सर्व प्रक्रिया करण्याचा अधिकार शेतकऱ्याला असला पाहिजे.
 हा कार्यक्रम इतका सोपा नाही. तुम्हाला वाटतं त्याच्यापेक्षा फार कठीण आहे. रस्त्यावर जाणं सोपं आहे. रेल्वेसुद्धा अडवणं सोपं आहे; पण एक चोर आपल्या छातीवरनं उठला आहे आणि धाकटा चोर आपल्या छातीवर अजून बसायचा आहे. एवढ्या अवकाशामध्ये कोलांटी उडी मारून शेतकऱ्यांच्या संघटनेला एकदम वेगळी हत्यारं देऊन वेगळ्या लढाईमध्ये वेगळ्या रणगाड्यात उतरवणं हे काम काही इतकं सोपं नाही.
 शेतकरी संघटना - शेतकऱ्यांची वाचा
शेतकरी संघटना ही राहणारच आहे. शेतकरी संघटना नसेल तर सरकारला

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ६०