पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/५८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मिळाली आहे. मग काय करायला पाहिजे?
 आळंदीचे निर्णय
 मी काही सूचना आळंदीच्या बैठकीसमोर ठेवल्या. त्या सूचना थोडक्यात अशा -
 पहिली गोष्ट म्हणजे आपण शेगावच्या शेतकरी मेळाव्यात असं जाहीर करावं की शेतकरी देशाला संकटातून सोडविण्याकरिता तयार झाला आहे आणि जी काही परकीय चलनाची अडचण तयार झाली आहे ते मिळविण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो, बाजूला हटा तुम्ही कारखानदारांनो, तुम्हाला जमण्यासारखं हे काम नाही. हे काम फक्त शेतकरी करू शकतो. हे काम कारखानदारांना जमणार नाही, आम्ही घडवून आणणार आहोत. पण शेतकऱ्यांची निर्यात होऊ नये म्हणून जे काही तुम्ही उद्योग करता ते तुम्हाला बंद करावे लागतील. तुम्ही शेतकऱ्यांना आवाहन केलं ना की आता निर्यात झाली पाहिजे. मग आता निर्यातीच्या मार्गामध्ये तुम्ही काही अडथळे आणले तर तुम्ही देशद्रोही आहात असं आम्ही म्हणू. यंदा कापसाचं पीक कमी आलं, निर्यात बंदी. चालायचं नाही. निर्यात बंदी म्हणजे काय असं पाण्याच्या नळाची चावी नाही. ती उघडली की पाणी वाहायला लागलं आणि बंद केली की पाणी थांबलं. जर तुम्हाला निर्यात व्हायला पाहिजे असेल तर देशामधल्या बाजारपेठेची स्थिती काही असो, पुरवठा पुरेसा असो वा नसो आम्हाला निर्यात करण्याची शक्यता असली पाहिजे. निर्यात बाजारपेठा तुमचं मन लागेल तेव्हा बुडवल्या गेल्या तर ते आम्ही सहन करणार नाही. याबद्दल मी पंतप्रधानांना लिहिलेलं पत्र काळजीपूर्वक वाचा. (शेतकरी संघटक : २१ सप्टेंबर १९९१.)
 यंदासुद्धा - आणि मला वाटतं हा फार चांगला विषय आहे - निर्यातीचा सर्वात मोठा विषय कोणता असेल तर तो कापूस आहे. मी असं म्हटलं की आंदोलनं करायला आता वाव नाही, आता आर्थिक मार्गाकडे जायला पाहिजे. पण सरकारने जर का कपाशीच्या निर्यातीवर बंदी घातली तर यापूर्वी कधीही झालं नाही इतकं मोठं आंदोलन कपाशीच्या निर्यातीच्या प्रश्नावर आपण करू; पण ते शेतकऱ्यांची मागणी म्हणून नव्हे तर आम्ही शेतकरी देश वाचवायला निघालो असताना, हे कर्मदरिद्री सरकार आम्हाला देश वाचवू देत नाही, म्हणून.
 शेतीच्या नवीन पद्धतींची गरज
 आता मात्र शेती करायची ती कमीत कमी खर्चात करायची आहे. कारण आपल्याला इतर देशांशी स्पर्धा करायची आहे. इतके दिवस खर्च कसा होतो, किती होतो याचा हिशोब आपण करत नव्हतो. आपण काय म्हणायचो? खतांच्या किमती तुम्ही काही ठरवा, मजुरी काही ठरवा; ते सर्व हिशोबात धरून

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ५८