पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२८५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असणार. एकदा एका कोण्यातरी हुशार बाईच्या लक्षात आले असेल, 'अरे, असे आपल्याला फाके पडू लागले, भूक लागू लागली तर निव्वळ पाणी पिऊन झोपण्यापेक्षा आपल्या झोपडीच्या किंवा गुहेच्या आजूबाजूला जे गवत उगवते त्या गवतावरचे छोटे छोटे दाणे असतात, ते दाणे म्हणजे धान्य, ते दाणे आपण तोडून पोटात टाकावे. म्हणजे थोडी तरी भूक भागते.' पहिल्यांदा त्यांनी आपल्या आजूबाजूच्या गवतामधून धान्य गोळा करायला सुरुवात केली असेल आणि त्यांच्या नंतर असे लक्षात आले असेल की हेच दाणे जमिनीत पडले तर त्यांच्यापासून पुन्हा गवत उगवते आणि त्याला पुन्हा दाणे येतात.
 सृष्टीचा हा अजब चमत्कार प्रथम पाहिला तो पुरुषांनी नाही, तर बायकांनी पहिल्यांदा पाहिला. पहिली शेती जी चालू झाली ती साधी शेती. त्याला आपण अगदी पहिली शेती म्हणजे ज्यात तंत्रज्ञान नाही म्हणून 'तंत्रज्ञानविहीन' शेती म्हणू. म्हणजे, बायकांनी त्यांच्या हाती लहान काठी घेतली, त्या काठीने जमीन फक्त उकरायची आणि त्याच्यामध्ये जे काही दाणे मिळाले असतील ते दाणे टाकायचे; रोपे आली आणि त्यांवर दाणे आले म्हणजे ते दाणे वेचून घ्यायचे; पाहिजे तर थोडे कुटायचे, थोडे भिजवायचे. अशा तऱ्हेने पहिली शेती ही स्त्रियांची चालू झाली.
 त्या वेळी कोणतेही तंत्रज्ञान नव्हते. मग, तंत्रज्ञानाची सुरुवात केव्हा झाली? जेव्हा शेतकरी पुरुषांना जंगलामध्ये एक बैल सापडला आणि त्यांच्या लक्षात आले की हा बैल मोठा उपयोगी प्राणी आहे, तो काही दंगाधोपा करणारा प्राणी नाही, त्याला वेसण घातली म्हणजे तो आपले ओढण्याचे काम चांगले करतो. असे दिसल्यावर मग पुरुषांनी बायांकडली शेती लगेच काढली आणि आपल्या हाती घेतली. बाई काठीने नुसती जमीन उकरायची आणि त्यात बियाणे टाकायची. त्याऐवजी आता बैलाला नांगराला जुंपायचे, जमीन चांगली खोल नांगरायची आणि मग त्याच्यामध्ये बियाणे टाकले की भरघोस पीक येऊ लागले. शेतकऱ्यांनी बैलाला नांगराला जुंपून जी बैलाची शेती करायला सुरुवात केली ते शेतीमधील पहिले तंत्रज्ञान.
  मी तुम्हाला तेव्हापासून ते आताच्या बीटी कॉटनपर्यंतचा आणि त्याहीनंतरचा इतिहास थोडक्यात सांगणार आहे; म्हणजे तुम्हाला औरंगाबादच्या अधिवेशनाचे महत्त्व समजेल.
 आजही बायकांना पुरुषांनी आपल्या हातून शेती काढून घेतली याचा राग आहे. ऋषिपंचमीच्या दिवशी बायका बैलाच्या श्रमाचे काही खात नाहीत. एका तऱ्हेने त्या निषेधच व्यक्त करतात - हा बैल आला आणि आमच्या हातातून शेतीची मालकी गेली म्हणून.

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २८५