पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२७५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पंतप्रधानांचे हे पत्र म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांचा अपमान आहे. मनमोहनसिंग हे माझे फार जुने मित्र आहेत आणि आजही ते माझ्याशी अत्यंत प्रेमाने बोलतात असे असले तरी शेतकरी माझा जवळचा का मनमोहनसिंग जवळचे असा प्रश्न जर माझ्यापुढे पडला तर त्यांनी शेतकऱ्यांच्या केलेल्या या अपमानाचा निषेध म्हणून मनमोहनसिंगांच्या प्रतिमेचे दहन करायला मी मागेपुढे पाहणार नाही. तेव्हा, यापुढे आंदोलनाची आखणी करताना त्यात मनमोहनसिंगांच्या या अपमानकारक पत्राची होळी करण्याचा कार्यक्रम अवश्य असावा.
 श्रेयासाठी धावपळ
 सरकारने कर्जमाफी जाहीर केली असली तरी शेतकरी अजून रडतोच आहे की मी कर्जमुक्त झालो नाही, मी अजून कर्जबाजारीच आहे आणि इकडे कर्जमाफीचे श्रेय लाटण्यासाठी बाजारबुणग्यांची गर्दी दाटली आहे. कोणी 'आमच्या साहेबांनीच शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं' असे डांगोरे पिटू लागले. परवा परवापर्यंत हे शेतीमालाला भाव मिळू नये म्हणत होते, गेल्या दोनतीन वर्षांत उसाच्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांना उसाला किमान वैधानिक किंमत देणे शक्य नाही असे हेच म्हणत होते, किमान वैधानिक किंमत मागणाऱ्या शेतकऱ्यांवर यांनी सरकारी पोलिसांबरोबर गुंडही सोडले ते आता कर्जमुक्तीचे लेखक आणि जनक झाले काय? ज्या कोणत्या मार्गाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांचा निषेध नोंदवता येईल असा कार्यक्रम आपल्या आंदोलनाच्या पुढील कार्यक्रमात अवश्य ठेवावा. हा तोतया, शेतकऱ्यांचे ज्याने जास्तीत जास्त नुकसान केलेला आणि ज्याने शेतकरी संघटनेच्या गेल्या पंचवीस वर्षांच्या कर्जमुक्तीच्या आंदोलनात प्रत्येक वेळी अडथळे आणले तोच जर तुटपुंज्या कर्जमाफीला कर्जमुक्ती म्हणत त्याचे श्रेय लाटू पाहतो तर शेतकऱ्यांनी त्याला घडा शिकवलाच पाहिजे. शेतकऱ्यांना खरेच कर्जमुक्ती हवी असेल तर राष्ट्रवादीच्या नेत्यांना जवळ उभे करून चालणार नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांचे खरे मित्र कोण आणि ढोंगी मित्र कोण हे त्यांना समजत नाही तोपर्यंत त्यांची कर्जमुक्ती होणार नाही.
 सांगलीची जुनी आठवण
 एके काळी वसंतदादा पाटील यांनी 'मी आता एक शेतकरी संघटना काढणार आहे' असे म्हटले. त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांमध्ये मोठी खळबळ माजली. वसंतदादांचा कारखाना केवढा मोठा, त्यांच्याकडे गाड्या किती, पैसे किती! साखर कारखान्याच्या उसाच्या बिलातून शेतकरी संघटनेला प्रतिटन २५ पैसे द्यावेत असा सभासद शेतकऱ्यांनी ठराव केला होता. आपली एक शेतकरी संघटना काढून त्यांनी ते पैसेसुद्धा खऱ्या शेतकरी संघटनेपर्यंत पोहोचू दिले

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २७५