पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२७२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दुसरा मुद्दा म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांची सगळी कर्जे अनैतिक आहेत. ज्या कोणा शेतकऱ्यांना वाटत असेल की आपण कर्ज घेतले; पण ते परत फेडले नाही म्हणजे आपण पाप केले आहे, त्यामुळे आपल्याला नरकात पडावे लागेल त्यांना मी पूर्वीच सांगितले आहे की हे पाप नाही. यापुढे जाऊन मी सांगितले आहे की या परिस्थितीतही जे शेतकरी कर्जाची परतफेड करतात तेच पाप करीत आहेत. शेतकऱ्यांनी शेत पिकवलं, सरकारने शेतीमालाला भाव मिळू दिला नाही.
 एका बाजूला राधाकृष्णन समितीच्या अहवालाप्रमाणे १ लक्ष १३ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांनी सरकारला द्यायचे आहेत आणि कृषि कार्यबलाच्या अहवालानुसार सरकारच्या धोरणांमुळे १९८१ ते २००० या वीस वर्षांत काळात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीपोटी सरकारने शेतकऱ्यांना ३ लक्ष कोटी रुपये द्यायचे आहेत. गणित मांडले तर शेतकरी सरकारचे देणे लागतात का सरकारच शेतकऱ्यांचे देणे लागते? तेव्हा शेतकऱ्यांनी आपण कर्ज फेडत नाही म्हणजे पाप करतो असे समजण्याचे काहीच कारण नाही. सरकारच शेतकऱ्याचे देणे लागत असल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावर दाखवली जाणारी कर्जे ही अनैतिकच आहेत.
 तिसरी गोष्ट १९८८ साली शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची लढाई सुरू करताना मी शेतकऱ्यांना घोषणा दिली की "मी कर्जबाजारी शेतकरी आहे, याचा मला अभिमान आहे." "गर्व से कहो, हम कर्जे में हैं।' कारण ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची फेड केली त्यांचे हिशोब बारकाईने तपासून पाहिले तर लक्षात येईल की केवळ शेतीवर पोट भरणारा शेतकरी कर्ज फेडू शकत नाही. त्याच्या घरात जर एखादा भाऊ शाळामास्तर असेल, चपराशी असेल, एखाद्या बँकेचा संचालक असेल किंवा साखर कारखान्याचा संचालक असेल तर तो कर्ज फेडू शकतो; केवळ शेतीच्या उत्पादनातून कर्ज फेडणे शक्य नाही.
 अलीकडे काही लोकांनी मोठा कांगावा चालवला आहे की आम्ही प्रामाणिकपणे बँकेची, सोसायटीची कर्जे भरली आणि त्यामुळे आम्हाला कर्जमाफीचा काहीच फायदा मिळाला नाही; तेव्हा आमच्याकरिताही सरकारने काहीतरी योजना काढली पाहिजे आणि शरद पवारांनी त्याला लगेच पाठिंबा दिला, लबाडांना त्यांचा पाठिंबा लगेच मिळतो. या लोकांना रोखठोक विचारले पाहिजे की, 'तुम्ही कर्ज फेडले ते शेतीच्या उत्पन्नातून फेडले का?' तुम्ही शेतीकरिता घेतलेले कर्ज शेतीच्या उत्पन्नातून फेडले असले तर कर्ज फेडणे म्हणायचे नाही तर तुमच्या भावाकडून घेतलेले नवे कर्ज आहे असे समजायला हवे. म्हणजे तुम्ही काही 'बेबाक' होत नाही.
 आणि या आधारानेच शेतकरी संघटनेने काय मागणी केली ते समजून घेतले

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २७२