पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२६४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

किंवा ३ पैसेच त्याच्यापर्यंत पोहोचतात. आजची परिस्थिती त्याच्यापेक्षा वाईट आहे. तेव्हा मुळातच सगळी पाईपलाइनच गळकी आहे. नोकरदार म्हणजेच सगळी पाईपलाईन नाही, त्यात आणखीही बरेच घटक आहेत. दुसरा मुद्दा म्हणजे सरकारी नोकऱ्या हव्यात असे ज्यांना वाटते, सरकारचा अर्थकारणात भाग हवा असे ज्यांना वाटते त्यांना एक प्रश्न विचारावा लागेल की, 'सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे ज्या चपराश्याचा पगार २२०० रुपये होता त्याचा पगार आता ८२०० किंवा सेक्रेटरीचा पगार १,३०,००० रुपये होणार आहे. सध्याच्या व्यवस्थेमध्ये आता MBA पास झालेल्या मुलांना खासगी नोकरीमध्ये महिन्याला दोन ते अडीच लाख रुपये पगार मिळतो आहे. जर का बुद्धिमान आणि कर्तबगार माणसे सरकारी नोकरीमध्ये यावीत असे वाटत असेल तर आजच्या पगारावर ती येतील का? बाहेर इतका पगार मिळत असताना तुमच्या कमी पगारावर कोणत्या पातळीची माणसे येतील याचा विचार केला आहे का?
 तेव्हा, हा केवळ सहाव्या वेतन आयोगाचा प्रश्न नसून नोकरदारांच्या बाजारपेठेचा प्रश्न आहे.
 संपूर्ण देशातील राजकीय परिस्थिती काय आहे? गेल्या काही दिवसांत अणुकराराला विरोध करण्याचं नाटक झालं, त्यामुळे निवडणुका आज होतात की उद्या अशी भीती तयार झाली आणि आता निवडणूक नको म्हणून नाटकावर पडदा पडला.
 उत्तर प्रदेश जिंकल्यानंतर बहुजन समाज पार्टी आपल्या विषयपत्रिकेवर राजस्थान, हरियाणा आणि महाराष्ट्र या राज्यांना घेऊन जे काही डाव खेळते आहे त्याचा आढावा घेणे आवश्यक आहे.
 १९८० सालापासून शेतकरी संघटनेने शेतीमालाला रास्त भाव मिळावा यासाठी शासनाविरुद्ध आंदोलने केली. त्या वेळी शेतकरी संघटनेच्या विरुद्ध असलेली मंडळी आता शेतकरी संघटनेचीच भाषा बोलू लागले आहेत; पण प्रत्यक्षामध्ये कार्यवाही तशी करीत नाहीत. उलट, शेतकऱ्यांच्या आत्महत्या चालू आहेत. त्याचबरोबर, १९८० साली शेतकरी संघटनेने दिलेली विषयपत्रिका संपायच्या आधी एक त्याहूनही मोठी विषय पत्रिकातयार होते आहे.
 एका पाहणीनुसार ४० टक्के शेतकरी शेतीतून बाहेर पडू इच्छित आहेत. ज्या शेतकऱ्यांना या शेतीच्या बेडीतून सुटायचे आहे त्यांचा प्रश्न कसा सोडवायचा?
 सगळ्या जगामध्ये हवामानात बदल घडतो आहे आणि त्या बदलामुळे जगातील पिकांचा नकाशा बदलून जाणार आहे. उष्ण कटिबंधात आज जी पिके येतात ती बंद होतील आणि ती शीत कटिबंधात येऊ लागतील. गव्हासारखे पीक

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २६४