पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२३३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मान्य केले की, आजही हिंदुस्थानातील शेतकऱ्यांना उणे सबसिडी आहे.
 शरद पवार अजूनही हे म्हणायला तयार नाहीत, म्हणून कांदे खावे लागले.
 या ओघातच तुम्हाला सांगतो की ज्यांच्या ज्यांच्या डोक्यावर कर्ज आहे त्यांनी कर्ज असण्याचा अपमान बाळगणे सोडून द्या. ज्याच्या ज्याच्या डोक्यावर कर्ज आहे त्या शेतकऱ्यांना मी सांगतो की तुम्ही यापुढे 'गर्व से कहो की हम कर्जे में हैं।' कारण, जो जो शेतकरी प्रामाणिक आहे तो तो कर्जात आहे. जो जो शेतकरी भामटेपणा करतो, कोठेतरी राजकारणात जातो, लांड्यालबाड्या करून सबसिड्या मिळवतो, कुठेतरी गोंधळ घालतो, काही नाही तरी हातभट्टी लावतो तोच शेतकरी फक्त कर्ज फेडू शकतो; बाकीचे सर्व फक्त शेतीवर जगणारे प्रामाणिक शेतकरी कर्जातच राहतात. तेव्हा 'गर्व से कहो हम कर्जे में हैं।' मी कर्जात आहोत याचा अर्थ मी प्रामाणिक आहे, माझा बाप प्रामाणिक आहे आणि माझे आजोबासुद्धा प्रामाणिक आहेत/होते आणि जे कर्जात नसतील आणि त्यांच्या १८ एकर जमिनीतून १८ लाख रुपये उत्पन्न निघत असेल तर ते भामटे आहेत, त्यांचा बाप भामटा आहे, त्यांचा आजोबासुद्धा भामटा आहे. कर्जात असणे हा आपला दोष नसून तो सरकारी धोरणाचा परिणाम आहे. तेंव्हा, कर्जाबद्दलचा हीनगंड सोडून द्या.
 दुसरा मुद्दा, ही सर्व कर्जे बेकायदेशीर आणि अनैतिक आहेत. कर्जाचा व्यवहार म्हणजे एक करार आहे आणि कराराला कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट लागू असतो. कॉन्ट्रॅक्ट ॲक्टनुसार जर 'अ' आणि 'ब' मध्ये एक करार झाला; पण 'अ' ने जर 'ब'ला करार पाळता येणार नाही असे कृत्य केले तर तो करार रद्दबातल धरला पाहिजे अशी या कायद्याची तरतूद आहे. हिंदू कॉन्ट्रॅक्ट ॲक्टनुसार, आपण लग्न हा एक संस्कार धरीत असलो तरीसुद्धा, तो करार मानला जातो. त्यामुळे लग्नाने एकत्र आलेल्या दोघांपैकी एकाने काहीतरी वाह्यात वागून किंवा बाहेरख्यालीपणा करून दुसऱ्याला नांदणे कठीण केले तर तो करारभंग होतो आणि तो करार रद्दबातल करता येतो. शेतकऱ्यांच्या कर्जाच्या बाबतीतही असाच करारभंग होत असतो. सहकारी/सरकारी बँकांनी शेतकऱ्यांना कर्जे दिली आणि त्याचबरोबर शेतीमालाला भाव मिळू नये अशी सरकारने व्यवस्था केली. म्हणजे, शेतकऱ्यांना सरकारकडून घेतलेले कर्ज फेडता येऊ नये अशी व्यवस्था सरकारनेच केली. तेव्हा सरकारच्या आधिपत्याखालील कोणत्याही संस्थेने शेतकऱ्यांना दिलेली कर्जे ही बेकायदेशीर आहेत.
 अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे. शेतकऱ्यांना नेहमी मनातून खात असते की

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २३३