पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२३०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

येऊन सुपासुपांनी धान्य घेऊन जातात अशी आमची वर्षानुवर्षांची परंपरा आहे.'
 शेतकरी एक दाणा पेरतो आणि त्यातून हजार दाण्यांची निर्मिती करतो. एखाद्या यंत्रामध्ये एक किलो म्हणजे हजार ग्रॅम लोखंड घातले आणि दुसऱ्या बाजूने दोन हजार सोडा हजार आणि एक ग्रॅम लोखंड बाहेर आले असे कोठे होत नाही. हे फक्त शेतकऱ्याच्या शेतीच्या कारखान्यातच होते. मग, ज्याच्या शेतामध्ये एका दाण्याचे शंभर, हजार दाणे होतात असा शेतकरी गरिबीत, बुडीत, कर्जात आणि ज्याच्या कारखान्यामध्ये हजार ग्रॅमचे हजार आणि एक ग्रॅमसुद्धा होत नाहीत तो मात्र हवेल्या बांधून मोठ्या थाटात राहतो हे काय गौडबंगाल आहे, ते समजून घ्यायला हवे. निसर्गामध्ये उत्पादन करणारा, गुणाकार करणारा फक्त शेतकरी आहे, दुसरा कोणी नाही आणि तरीही तो गरीब राहत असेल तर त्याचा अर्थ असा की, तुमच्या शेतीमध्ये झालेला गुणाकार पळवून नेण्याचा धंदा होतो आहे. थोडक्यात सांगायचे तर, उत्पादन करणारा फक्त शेतकरी आहे, बाकी सगळे लोक त्या उत्पादनाचे रूप बदलतात. शेतकरी एका दाण्याचे शंभर, हजार दाणे बनवतो तो गरीबच राहतो. पण त्याच दाण्याचे पीठ बनवणारा ब्रेड बनवणारा, बिस्किटे बनवणारा अशांना पैसा मिळतो; दाणा पिकवणाराला मिळत नाही. हे काय प्रकरण आहे?
  या प्रश्नाचे उत्तर मी १९८० सालापासून अनेकवेळा दिले आहे, त्याची इथे उजळणी करतो.
 शेती तोट्यात आहे, शेतकरी गरीब आहे, शेतकरी कर्जबाजारी आहे याचे कारण शेतकरी आळशी आहे असे नाही; शेतकरी निरक्षर आहे, शेती कशी करायची हे त्याला कळत नाही असे नाही; शेतकरी व्यसनी आहे हेही खोटे. शेतकरी लग्नासारख्या प्रसंगी, सणासुदीला जास्त खर्च करतो म्हणून कर्जात बुडतो हेही खोटे. शेतकरी कर्जात जातो, शेतकरी गरीब आहे याचे खरे कारण हे की शेतीमध्ये माल पिकवण्याचा जितका खर्च येतो, एक दाण्याचे हजार दाणे करण्याकरिता जे काही श्रम करावे लागतात, कष्ट करावे लागतात, भांडवल गुंतवावे लागते ते सर्व शेतीमालाला बाजारात मिळणाऱ्या किमतीतून भरून येत नाही. शेतीमालाला अशी किंमत मिळत नाही याचे कारण सरकारने शेतीमालाला रास्त भाव मिळू नये असे धोरण ठरवले आहे. कारखाने जोरात चालावे, कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना भाकरी स्वस्त मिळावी, कारखान्याला लागणारा कच्चा माल स्वस्तात स्वस्त मिळावा म्हणून शेतीमालाचा भाव पाडण्याचे धोरण या देशाच्या सरकारने आखले. गोऱ्या इंग्रजाच्या काळात हेच धोरण होते;

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २३०