पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२२८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सर्वांनाच माहीत आहे. आज बँका काय करतात? तुम्ही जर कर्ज घेतले असेल तर त्यावर महिन्याने, दोन महिन्यांनी, तीन महिन्यांनी व्याज आकारणी करतात आणि ही व्याजाची रक्कम पुढील काळासाठी मुद्दलात जमा करतात. म्हणजे पुढच्या मुदतीसाठी मागील मुदतीतील व्याजावरही व्याज आकारले जाते. अशा तऱ्हेने व्याजावर व्याज आकारू नये अशी तरतूद इंग्रजांनी आपल्या १९१८ सालच्या कायद्यात करून ठेवली आहे. त्याखेरीज, सावकाराने वसूल केलेल्या कर्जव्याजाच्या बाबतीतही जर शेतकऱ्याने न्यायालयात अर्ज करून हरकत घेतली आणि आपल्यावरील कर्जाच्या हिशोबात चूक झाल्याची शंका व्यक्त केली तर ते प्रकरण न्यायालयाने पुन्हा उघडून हिशोब करून व्याज आकारणीबाबत फसवणूक झाली असेल तर सावकाराने जादा वसूल केलेली रक्कम शेतकऱ्याला परत मिळवून देण्याची तरतूदही या कायद्यात होती. हा तर केंद्राचा, व्हाइसरायचा कायदा झाला. पण त्यापुढे जाऊन मद्रास आणि म्हैसूर इलाख्यांच्या सरकारांनी त्या कायद्यात आणखी सुधारणा करून आणखी एक तरतूद केली की शेतकऱ्यांच्या कर्जावरची व्याज आकारणी कर्जाची दामदुप्पट होणार नाही येथपर्यंतच करता येईल. म्हणजे व्याजाची रक्कम मुद्दलाइतकी झाली की व्याज आकारणी बंद करायची. हे इंग्रजांच्या राज्यातील धोरण.
 आज आपल्याच लोकांनी चालवलेल्या राज्यात काय अनुभव येतात. नांदेडमधील एका शेतकऱ्याने ९६ हजार रुपयांचे कर्ज घेतले आणि ८ वर्षांनी त्याच्यावर त्या कर्जापोटी देणे झाले १८ लाख रुपये. माझ्यासमोर सातऱ्यातल्या एका शेतकऱ्याची चिठ्ठी आहे. नाव : मारोती केसू सावंत. २००० साली ४७ हजार रुपये कर्ज काढले. त्या कर्जापोटी आतापर्यंत २ लाख ९१ हजार रुपये भरले आहेत. तरीही बँक म्हणते आहे की तुम्ही आमचे अजून ५ लाख रुपये देणे लागता. ही काही एक-दोन उदाहरणे नाहीत. महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील प्रत्येक प्रामाणिक शेतकऱ्याच्या कर्जाच्या बाबतीत जवळपास अशीच परिस्थिती सापडेल. त्या दिवशी येडे मच्छिंद्र येथेही पाच-सहा शेतकऱ्यांनी अशाच कैफियती मांडल्या. त्यावेळी भाषण करताना मी म्हटले, 'नानासाहेब, शेतकऱ्यांना जाच करणाऱ्या सावकार, अधिकाऱ्यांना तुमच्या काळी तुम्ही पत्र्या मारल्या, तुमच्यावेळी असे सवाई सावकार सहकार महर्षी असते तर तुम्ही त्यांचे काय केले असते? तुम्ही जे काही केले असते ते करण्याची बुद्धी आणि धैर्य, तुम्ही ज्या मातीत जन्मलात त्याच मातीत जन्मलेल्या लोकांना द्या.'
 १९८१ साली निपाणीला आम्ही तंबाखू शेतकऱ्यांबरोबर तंबाखूला फक्त १०

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २२८