पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२०६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 त्या चक्रव्यूहाचा भेद मी करू शकेन याबद्दल माझ्या मनात शंका नाही. कारण डंकेल प्रस्तावाच्या चर्चेच्या वेळी मी विरुद्ध सारा हिंदुस्थान अशी चर्चा झाली. त्याही वेळी कम्युनिस्ट, स्वदेशी जागरण मंचाचे लोक, गांधीवादी, सर्वसेवा संघ, डॉ. मनमोहनसिंग, पी. चिदंबरम, मोंटेकसिंग अहलुवालिया अशी सगळी मंडळी माझ्या विरोधात होती; पण भारत शासनाने माझं ऐकलं आणि जागतिक व्यापार संस्थेच्या करारावर त्यांनी सह्या केल्या. त्यामुळे, संसदेतील ६३ कम्युनिस्ट खासदारांशी वादविवाद करताना मी जिंकेन याबद्दल माझ्या मनात बिल्कुल शंका नाही.
 पण त्यांच्या हातात एक हत्यार आहे. ते हत्यार माझ्याही हातात आहे. पण माझ्या हातातील हत्यार थोडं परजून ठेवण्याची आवश्यकता आहे.
 समाजवादाचा पाडाव झाल्यानंतर जसजसं स्पर्धेचं युग येऊ लागलं तसतसे संघटित कामगार आणि नोकरदार मोठे चवताळले आहेत. कारण, नागपूरच्या अधिवेशनात म्हटल्याप्रमाणे, नेता-तस्कर-गुंडा-अफसर हे समाजवाद पडल्यापासून मोठे बेचैन झाले आहेत. आपलं राज्य पुन्हा यावं याकरता त्यांनी संघटित कामगार आणि नोकरदारांचे संप, हरताळ इत्यादी विकासविरोधी कारस्थाने सुरू केली. आता २४ ऑगस्ट २००४ पासून बँकांचा संप चालू होणार आहे, २ सप्टेंबरपासून मुंबईत कामगारांचा संप सुरू होणार आहे. संपूर्ण हिंदुस्थानमध्ये अशांती माजवायची, संप, हरताळ करायचे, नक्षलवाद्यांकडून हिंसाचार घडवून आणायचे आणि त्याच्या आधाराने लोकसभेत, राज्यसभेत 'गरिबांचा आक्रोश' आहे असा गदारोळ करून 'खुली व्यवस्था काढून टाका', 'जागतिक व्यापार संस्थेतून बाहेर पडा' असा धोशा लावायचा असा त्यांचा रणव्यूह आहे.
 'गरिबांची भाषा तुम्ही बोलता कशाला? तुमचे गरीब कोण? पन्नास हजार ते एक लाख रुपये ज्यांचे वार्षिक उत्पन्न असेल त्यांची तुम्ही आयकरातून सुटका केली ते तुमचे गरीब? शेतकऱ्यांतले गरीब कोण? जे ट्रॅक्टर खरीदतात ते? खरे गरीब ते की उद्या जगावं कसं हे कळत नाही म्हणून जे आत्महत्या करायला प्रवृत्त झाले आहेत असे हिंदुस्थानातील शेतकरी. आजपर्यंत आत्महत्या केलेल्यांपैकी एकही नोकरदार नाही, एकही कामगार नाही. सगळे आहेत ते कर्जबाजारी शेतकरी आहेत' अशा प्रकारचे युक्तिवाद करीत मी या, समाजवाद पुन्हा आणू इच्छिणाऱ्या ताकदींना आजपर्यंत थोपवून ठेवलं आहे; पण यापुढे जसजशी त्यांची आंदोलनं होत राहतील तसतसा माझा एकट्याचा आवाज त्या ६३ लोकांच्यापुढे टिकायचा असेल - ज्यांना मनमोहनसिंग, सोनिया गांधी, लालूप्रसाद, मुलायमसिंग अशा सगळ्यांचा पाठिंबा आहे - त्यांना जर टक्कर द्यायची असेल तर मला तुम्हा शेतकऱ्यांकडून एका मदतीची अपेक्षा आहे.

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २०६