पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१८०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दारूड्या नवऱ्याच्या हाती एकही पैसा न देणे हे तिचे कर्तव्य बनते. त्याचप्रमाणे, आज आम्ही निर्णय घेतो आहोत की यापुढे सरकारला एक पैसाही देणार नाही; वीज बिले भरणार नाही. आम्ही कर्ज फेडणार नाही कारण आम्ही मुळात देणेच लागत नाही; ९६-९७ या केवळ एका वर्षात ज्या सरकारने शेतकऱ्यांकडून १ लाख १३ हजार कोटी रुपये लुटून नेले आहेत ते अवघ्या १३ हजार रुपयांच्या कर्जासाठी आमच्या घरावरील छप्पर काढू शकत नाहीत. इतके असूनही सरकारी अधिकारी जर वसुलीसाठी जप्ती करू पाहत असतील किंवा अटक करण्याचा विचार करीत असतील तर समजा की हे सरकारी अधिकारी नाहीत, सरकारी वर्दीतील लुटारू आहेत आणि स्वसंरक्षणासाठी नाना पाटलांच्या मार्गाने आम्हाला जे करणे शक्य होईल ते आम्ही करू. आजपर्यंत शेतकरी दीनवाणाच दिसत होता, या लढाईत तो अशी तडफ दाखविणार आहे की त्याच्या दर्शनाने आजपर्यंतचे त्याचे शोषक थरथर कापायला लागतील.

(१२ नोव्हेंबर २००० शेतकरी संघटना आठवे अधिवेशन सांगली-मिरज.)
(शेतकरी संघटक २१ नोव्हेंबर २०००)

◼◼

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १८०