पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१६५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


गुलामगिरीकडे आता पुन्हा जाणे नाही


 माझी खात्री आहे की काही वर्षे जातील आणि स्वातंत्र्याच्या सूर्याला घाबरणाऱ्या घुबडांचे दिवस संपतील आणि त्यावेळी आपलीच नातवंडे आपल्याला विचारायला लागतील की, हिंदुस्थानच्या शेतकऱ्यांनी 'हातामध्ये आता पुन्हा बेड्या घालायच्या नाहीत, स्वतंत्र व्हायचे' असे ज्यात ठरवले त्या सांगलीमिरजच्या अधिवेशनाला तुम्ही खरेच हजर होता? अशा जागी तुम्ही सर्व उपस्थित आहात, मलाही हजर राहण्याची संधी लाभली हे केवढे मोठे भाग्य!
 नाना पाटील आणि म. फुले
 अधिवेशनाच्या या नगराचे नाव 'क्रांतिसिंह नाना पाटील नगर' आणि जेथे थोडे दिवस प्रतिनिधी अधिवेशन चालले त्याचे नाव 'महात्मा जोतिबा फुले सभागृह'. या नामकरणात चांगला संयोग साधला आहे. १९४२ साली महात्मा गांधींनी इंग्रजांना 'चले जाव' म्हटले आणि तरुणांना सांगितले की, 'करा किंवा मरा; यापुढे गुलामगिरी स्वीकारू नका.' सगळे नेते तुरुंगात गेले, गांधीजी तुरुंगात गेले. लोकांपुढे कोणी मान्यवर नेता बाहेर राहिला नाही अशा वेळी सातारा जिल्ह्यामध्ये शेती करता करता शड्डू ठोकून पहिलवानी करणारी काही तरुण पोरे एकत्र झाली आणि सातारा जिल्हातरी इंग्रजांपासून स्वतंत्र झाला अशी परिस्थिती करून टाकली, जिल्ह्यातील इंग्रजांचे राज्य संपवून टाकले. त्या तरुणांचे नेतृत्व करणाऱ्या नाना पाटलांचे नाव शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याची घोषणा करणाऱ्या या नगराला देण्यात मोठे औचित्य साधले आहे.
 सभागृहाला म. जोतिबा फुल्यांचे नाव देण्यात आले आहे. इंग्रज आल्यानंतर पहिल्यांदा शेतकऱ्यांसाठी तलवार हाती घेऊन येणारा हा तरुण. ते म्हणायचे, 'इंग्रज हिंदुस्थानात आले आहेत हे खरे आहे. त्यांच्या येण्याने आपले स्वातंत्र्य हिरावून घेतले असले तरी त्यांच्या येण्याने एक थोडासा चांगला भागही साधला आहे. इतके दिवस आपल्या संस्कृतीमध्ये – 'भटशाही'मध्ये शूद्रांना शिकायचा

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १६५