पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१५९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अर्थाने, कर्जमुक्ती आंदोलनाची सुरुवात झाली.
 धुळ्याला तिसरे अधिवेशन (१९८५) झाले. महाराष्ट्रात निवडणुका जाहीर झाल्या होत्या, त्यावेळी शेतकरी संघटनेची राजकीय भूमिका ठरविण्यासाठी ते आंदोलन झालं.
 नागपूरचं अधिवेशन (१९९४) खुली अर्थव्यवस्था सुरू झाल्यानंतर आलेल्या निवडणुकांसाठी शेतकरी संघटनेची भूमिका ठरविण्याकरिता झालं. त्याआधी नांदेड येथे झालेले चौथे अधिवेशन (१९८९) आणि औरंगाबाद येथे झालेले पाचवे अधिवेशन (१९९३) ही दोन्ही, नेहरूप्रणीत समाजवादी बंदिस्त अर्थव्यवस्था आणि खुली अर्थव्यवस्था यांच्या उंबरठ्यावर झाली. अधिवेशन हे निर्णय घेणारं सर्वोच्च व्यासपीठ आहे.
 अशा तऱ्हेनं, शेतकरी संघटनेचं प्रत्येक अधिवेशन हे विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्यानंतर निर्णयप्रक्रियेत व्यापकता यावी यासाठीच भरवले गेले आणि त्यादृष्टीने ते यशस्वीही झाले आहे.
 सांगली-मिरजमध्ये शेतकरी संघटनेचे आठवे अधिवेशन ११ व १२ नोव्हेंबर २००० रोजी होत आहे. या अधिवेशनाची विषयपत्रिका काय असावी? आज भारतीय शेतकऱ्यासमोर कोणते गंभीर प्रश्न उभे आहेत?
 शेतकरी संघटनेची राजकीय भूमिका
 आज सगळीकडे चर्चा सुरू आहे की या अधिवेशनाच्या वेळी शेतकरी संघटना कोणत्या ना कोणत्या पक्षात विलीन होऊन जाणार आहे. वर्तमानपत्रातून चर्चा सुरू आहे की १९८० साली मोठ्या जोशात सुरू झालेली शेतकरी संघटना आता ओंफस झाली आहे. ती कोणत्यातरी पक्षात विलीन होणे आता अपरिहार्य आहे. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की शेतकरी संघटना इतर कोणत्या पक्षामध्ये सामील करण्याविषयी चर्चा करण्याचा मसुदा असण्याची काहीही शक्यता नाही. शेतकरी संघटनेची राजकीय भूमिका सटाण्याच्या पहिल्याच अधिवेशनातील ठरावाने पक्की झाली आहे आणि आजतागायत ती त्या ठरावाशी नेहमीच सुसंगत राहिली आहे. कोणत्याही पक्षाचं सरकार असो, ते शेतकऱ्याच्या बाजूचं कधी असत नाही - काँग्रेसचं असो, भाजपाचं असो, शिवसेनेचं असो की आणखी दुसऱ्या कोणत्या पक्षआघाडीचं असो. आज दिल्लीमध्ये ज्या पंतप्रधानांच्या निमंत्रणाला मान देऊन मी कृषि कार्यदलाचं अध्यक्षपद स्वीकारलं आहे त्यांच्या पक्षाची धोरणंसुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूची आहेत असं म्हणणं अशक्य आहे. आज पंजाबहरयानामध्ये सरकार भाताची खरेदी करीत नाही, भात गुणवत्तेत कमी आहे असं हे सरकार त्यासाठी कारण पुढे करीत आहे. महाराष्ट्रातही सोयाबीन,

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १५९