पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१४२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


राज्य आले ठग पिंढाऱ्यांचे


 संकटे समोर पुष्कळ आहेत. उसाचे गाऱ्हाणे आहे, कापसाचे गाऱ्हाणे आहे, पाण्याचे गाऱ्हाणे आहे, विजेचे गाऱ्हाणे आहे, कांद्याचे गाऱ्हाणे आहे आणि शेतकरी कर्जामध्ये असा डुबत चालला आहे की १४ जानेवारी रोजी आंध्र प्रदेशातील वारंगल जिल्ह्यामध्ये तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची या वर्षातील पहिली बातमी वर्तमानपत्रात आली; त्यानंतर विदर्भातही आत्महत्या झाल्याची बातमी आली; पंजाबमध्ये आत्महत्या व्हायला सुरुवात झाली. १९ जानेवारीला दिल्लीमध्ये देशभरातील शेतकऱ्यांच्या संघटनांच्या किसान समन्वय समितीची बैठक झाली त्यामध्ये या बातम्यावर विचार करण्यात आला.
 केंद्रीय वित्तमंत्री श्री. यशवंत सिन्हा यांच्यासमोर अंदाजपत्रकपूर्व चर्चा सुरू होत्या. मी त्या चर्चेच्या वेळी हजर होतो. देशभर शेतकरी आत्महत्या करण्याच्या अवस्थेत आहेत, वित्तमंत्री म्हणजे साऱ्या देशाच्या तिजोरीच्या किल्ल्या ज्याच्या हाती आहे असे पदाधिकारी; तेव्हा आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभे असलेल्या शेतकऱ्याला दिलासा वाटावा अशी काहीतरी चर्चा तेथे होईल असे मला वाटले होते; पण तेथे मांडणी मात्र वेगळीच झाली, "कित्येक वर्षे झाली, शेतकऱ्यांच्या मिळकतीवर काही कर नाहीत. हिंदुस्थानातले इतर सर्व लोक आपापल्या मिळकतीवर कर भरतात. आता शेतकऱ्यांमध्येही श्रीमंत शेतकरी काही थोडे नाहीत. तेव्हा येत्या अंदाजपत्रकामध्ये शेतकऱ्यांवर आयकर (इन्कमटॅक्स) लावावा." अशी मांडणी करून सरकार शेतकऱ्यावर इन्कमटॅक्स लावण्याची जय्यत तयारी करीत आहे.
 आणि इकडे शेतकऱ्यांच्या गाऱ्हाण्यात वाढच होत आहे अशी आणीबाणीची परिस्थिती उभी राहिली आहे.
 वित्तमंत्र्यासमोर चाललेल्या चर्चेत मी शेतकऱ्यांच्या वतीने शेतीउत्पन्नावरील इन्कमटॅक्ससंबंधी शेतकरी संघटनेची भूमिका मांडली.

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १४२