पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/११५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पेक्षा जास्त 'धा' जमा करायचे. अशी
 ध-मा-धा व्यवस्था सुरू झाली. या व्यवस्थेचा फायदा मिळवायच्यामागे लोक लागले. प्रत्येकाने असा व्यक्तिगतरीत्या फायदा मिळविण्याचा प्रयत्न सुरू केल्यानंतर परिणाम असा झाला की धनिकांकडे, उद्योजकांकडे, भांडवलदारांकडे पैसा साठून राहायला लागला आणि हे सर्व लोक कामगारांचं शोषण करीत असल्याने कामगार उत्पादन करायचे पण त्यातून तयार होणारं धन मात्र त्यांच्या हाती येत नसे, त्यांना मजुरी मिळत नसे. त्यामुळे परिस्थिती अशी निर्माण झाली की कारखानदारांनी भांडवल गुंतवायचे, मजुरांकडून माल तयार करून घ्यायचा, माल बाजारात आणायचा पण बाजारात आलेला माल विकत घ्यायला कुणाकडे पैसा नसे. कारण जे ग्राहक आहेत त्यांचं शोषण झालेलं, त्यांच्या हाती पैसा नाही. मजुरांच्या रूपाने माल त्यांनीच तयार केला होता, पण जितका माल तयार केला तितका पैसा मजुरीच्या रूपाने कामगारांच्या, पर्यायाने ग्रहकांच्या हाती न गेल्याने बाजारात मंदीची लाट येते. कारखाने बंद पडतात. त्यामुळे हजारो लाखो कामगार भीक मागत फिरतात. हा भांडवलशाही व्यवस्थेतील दोष आहे. अशी मांडणी मार्क्सवादी करतात.
 नोकरदार बनविणारा विचार
 हा दोष दूर करण्यासाठी ते काय उपाय सुचवतात? खाजगी मालमत्ता संपवा. सगळ्या खाजगी मालमत्तेचे राष्ट्रीयीकरण करा. संपत्तीचे समान वाटप करा असे जे आम्ही म्हणतो आहोत ते काही आमच्यावर - कामगारांवर - उपकार करा असं सांगण्यासाठी नाही. तर, समाजाला लागलेला हा जो मंदीचा रोग आहे तो दूर करावयाचा असेल तर त्याला पर्याय नाही म्हणून संपत्तीचे समान वाटप आवश्यक आहे. जे काही निर्णय घ्यायचे ते काही व्यक्तींच्या किंवा व्यक्तिसमूहांच्या फायद्याकरिता घेऊ नका, सकल समाजाचे हित पाहा. समाजाचे हित कोण पाहणार? भांडवलदार थोडेच पाहणार आहेत? कामगार वर्गच असा आहे की ज्याच्याकडे मालमत्ता नसल्यामुळे तो व्यवस्थितपणे आर्थिक निर्णय घेऊ शकतो. या कामगार वर्गाच्या हाती हुकूमशाही आली पाहिजे. मार्क्सवाद्यांच्या या मांडणीत मंदीचा धोका टाळण्यावरील औषध म्हणजे समाजातील सगळ्या मालमत्तेचे राष्ट्रीयीकरण करावे, जे कोणी याला विरोध करतील त्यांना संपवून टाकावे, सर्वांनी नोकरदार होऊन राहायचे आणि सरकार मग त्यांना त्यांच्या गरजेप्रमाणे पुरवठा करणार. म्हणजे ज्याने त्याने आपापल्या ताकदीप्रमाणे उत्पादन करावं आणि आम्ही सरकार म्हणून ज्याला त्याला गरजेप्रमाणे पुरवठा करू अशा स्वरूपाच्या समाजाची मांडणी मार्क्सवाद्यांनी केली.

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ११५