पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पुरस्कार, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती महोत्सव, विविध चित्रपट महोत्सव, इत्यादींचे आयोजन करून हे स्मारक त्यांनी चैतन्यशील बनविले. येथील कलादालन व पुस्तक दालन सुरू झाल्यापासून कोल्हापुरात रोज चित्रप्रदर्शन व ग्रंथप्रदर्शन असतेच असते. हे स्मारक भवन आता शहरवासीयांचे भेट केंद्र (मिटिंग पॉइंट) बनले आहे. ट्रस्टचा सांद्यत इतिहास स्मरणिकेच्या रूपात प्रकाशित करून इतिहासलेखनाचे मोठे काम त्यांनी तडीस नेले आहे.
 कोल्हापूर हे पूर्वीपासून ऐतिहासिक सांस्कृतिक शहर. या शहर व जिल्ह्यामध्ये पर्यटन विकासाची मोठी क्षमता आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी अंबाबाई मंदिरासाठी दर्शन मंडप योजना तयार केली. जोतिबा, पन्हाळा, वारणा रोप वेला गती दिली. “करिश्मॅटिक कोल्हापूर' नावाचे पर्यटन केंद्र, कॉफी टेबल बुक, कॅलेंडर, प्रवासवर्णन लिहून तयार करून प्रकाशित केले व कोल्हापूरला आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर स्थान मिळवून दिले. राजर्षी शाह जन्मस्थळ विकासाला त्यांनी निधी मिळवून दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रंथविक्री केंद्राची पायाभरणी केली. पर्यटनाचे आकर्षण वाढावे म्हणून संदेश भंडारी या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या छायाचित्रकाराकडून संपर्ण जिल्ह्याचे छायाचित्रण करवून घेतले. अशी दूरदृष्टी असलेले प्रशासक म्हणून लक्ष्मीकांत देशमुख यांची वेगळी ओळख नजरेत भरल्याशिवाय राहत नाही.

 लक्ष्मीकांत देशमुख यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्य करताना दोन क्रांतिकारी कार्ये केली. ते नेटसॅव्ही प्रशासक होते. त्यांनी पाहिलं की कोल्हापूर हा एकेकाळी पुरोगामी विचार, व्यवहारांचा बालेकिल्ला; पण अतिरिक्त कृषी समृद्धीमुळे स्त्रीभ्रूण हत्येवर तो आघाडीवर! येथील स्त्री प्रमाण राज्यात सर्वांत कमी. त्यांनी यात बदल घडवून आणण्याचं ठरवलं. लिंगनिदानास राज्यात बंदी आहे; पण त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. त्यासाठी त्यांनी कायदा, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद व महानगरपालिका यांच्यात समन्वय निर्माण केला. डॉक्टरांचे प्रबोधन केलं. जनतेत जागृती घडवून आणली. याचं मूळ सोनोग्राफी मशीनमध्ये आहे हे लक्षात आल्यावर संशोधन करून ‘सायलेंट ऑब्झर्व्हर' सॉफ्टवेअर विकसित केलं. ते सोनोग्राफी केंद्रांना सक्तीचे केलं. दोन वर्षांनंतर मुलींचं प्रमाण वाढवून दाखविलं. त्याबद्दल त्यांना राष्ट्रीय सन्मान मिळाला. हरियाणा, पंजाबसारख्या राज्यांनी त्यांचा प्रकल्प आपल्या राज्यात राबवून महाराष्ट्राच्या डोळ्यात अंजन घातलं, मग महाराष्ट्र शासनानेही 'स्त्रीभ्रूण हत्या' आपला प्रधान कृती कार्यक्रम बनविला. याचं सारं

माझे सांगाती/६१