पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
७२४
 

साठी शिक्षा ही कल्पनाच या देशात नवीन होती. टिळकांच्या अनेक मित्रांनी त्यांना 'या लष्करच्या भाकरी तुम्ही का भाजता, माफी मागून मोकळे व्हा' असा सल्ला दिला होता. सार्वजनिक कार्य या लष्कराच्या भाकरी आहेत असा समज सुशिक्षितांतही त्या वेळी रूढ होता. सार्वजनिक जीवन, राष्ट्रीय जीवन, राष्ट्रभक्ती यांपासून आपण किती दूर होतो, आणि लो. टिळकांनी येथे नवे काय निर्माण केले, ते यावरून कळेल.

कायदेभंग
 १९०५ साली सरकारने वंगभंगाची घोषणा केली, तेव्हा सर्व बंगाली जनता संतप्त झाली आणि अर्जविनंत्यांचे राजकारण संपले हे जाणून तेथील नेत्यांनी स्वदेशी व बहिष्कार हे दुधारी शस्त्र हाती घेण्याचा निश्चय केला. लो. टिळक, १९०३ सालापासून, 'कायदेशीर चळवळ फलद्रुप होत नसेल तर दुसरा मार्ग काढला पाहिजे', असे सांगतच होते. त्यामुळे त्यांना बंगाली चळवळीमुळे अत्यंत समाधान वाटून केसरी- मराठ्यांतून सर्व देशभर याचा प्रसार करण्यास त्यांनी प्रारंभ केला. १९०६ साली बारीसाल येते सभा-मिरवणुकांना बंदी घालण्यात आली, तेव्हा बंगाली लोकांनी प्रत्यक्ष कायदेभंगच केला, आणि भारतात एका नव्या युगास सुरुवात झाली. याच सुमारास टिळकांनी आपले बहिष्कारयोगाचे तत्त्वज्ञान सविस्तर स्पष्ट करून सांगितले. १८८१ सालीच त्यांनी लिहिले होते की 'राजकीय शिक्षा ही लोकमतावर अवलंबून असते. आपण उद्या तुरुंगात जाणे ही शिक्षा मानलीच नाही तर राजकीय शिक्षेचा उपयोग काय होणार ? लोक आनंदाने तुरुंगात जातील.'

बहिष्कार
 बहिष्कार याचा अर्थ केवळ विदेशी मालावर बहिष्कार येवढाच नव्हता. पोस्ट, रेल्वे, सेक्रेटरीएट, जमाबंदी, पोलीस, न्यायखाते आणि शेवटी सैन्य या सर्वांवर बहिष्कार, असा टिळकांचा व्यापक अर्थ होता. कायदेभंग, साराबंदी, करबंदी हे त्यातले प्रधान कलम होते. अशा या बहिष्कारयोगाचा प्रचार ते १९०३ सालापासून करीत होते. वंगभंगाच्या चळवळीने तिला थोडी फळे येऊ लागली होती. एवढ्यात त्यांना सहा वर्षांची शिक्षा झाली आणि सर्वच चळवळ थंडावली.

संघटित शक्ती
 १९१४ माली लो टिळक सुटून आले, तेव्हा सर्वत्र अंधार पसरला होता. पण त्याने निराश न होता त्यांनी फिरून जोमाने बहिष्कारयोगाचा धागा जरा मवाळ करून, पुन्हा चळवळीस प्रारंभ केला. लखनौ, कलकत्ता व अमृतसर येथे काग्रेसची अधिवेशने झाली चिकोडी, बेळगाव, अहमदाबाद, गोध्रा येथे प्रांतिक परिषदा झाल्या. या सर्व सभा परिषदांना टिळक गेलेच होते. शिवाय सिंध, मद्रास, बंगाल, दिल्ली, कानपूर,