पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
७२०
 

चालवून जनतेत जागृती निर्माण केली आणि काँग्रेसच्या रूपाने संघटित प्रतिकारशक्ती निर्माण केली.

एक पाय तुरुंगात
 'आमच्या देशाची स्थिती' या निबंधात विष्णुशास्त्री यांनी स्पष्ट लिहिले आहे की आमच्या प्रस्तुतच्या दैन्यास आमच्या आर्यबंधूंचे आधिपत्य हे मुख्य कारण आहे. तेव्हा ते नाहीसे झाले असता आमची स्थिती सुधारेल हे कोणाच्याही लक्षात येईल. आगरकरांनी त्यांच्याबद्दल लिहिताना, 'त्यांचा कल्पनाविहंग स्वतंत्र हिंदुस्थानच्या लोकसत्ताक राज्यात विहरत असे,' असे म्हटले आहे. 'तुम्ही इतके कडक कसे लिहिता ?' असे विष्णुशास्त्री यांस कोणी विचारले असता, 'एक पाय तुरुंगात ठेवूनच आम्ही देशभक्तीसाठी आपली लेखणी हातात घेतली,' असे उत्तर त्यांनी दिले. नवी राजकीय संस्कृती ती हीच. ब्रिटिशांवरच्या विश्वासाचे राजकारण येथे संपले आणि नवे आत्मविश्वासाचे, स्वकर्तृत्वाचे, स्वाभिमानाचे युग सुरू झाले. विष्णुशास्त्री यांनी प्रत्येक निबंधात ब्रिटिशांचे काळे अंतरंग लोकांना दाखवून दिले आहे. पण त्यांच्या बरोबर त्यांची शिस्त, त्यांचा राष्ट्राभिमान, त्यांची विद्याभिलाषा, त्यांची उद्योगप्रियता या गुणांचे वर्णन करण्यास ते कधीही विसरले नाहीत. कारण पाश्चात्य विद्येने ही नवी पाश्चात्य संस्कृती त्यांना येथे आणावयाची होती. राष्ट्राभिमानाच्या बाबतीत 'पाश्चात्यांना आपण गुरू केले पाहिजे' असे त्यांनी निःसंकोचपणे म्हटले आहे. पण याचवरोवर या गुरूपासून त्याचे गुण घेऊन त्याला येथून घालवून दिले पाहिजे हे सांगण्यासही ते कचरले नाहीत.

मानसिक क्रांती
 राष्ट्राभिमान निर्माण करण्यासाठी विष्णुशास्त्री यांना आमूलाग्र मानसिक क्रान्ती करावयाची होती. निवृत्ती, धननिंदा, अनेक लोकभ्रम, षड्विकारांची अवहेलना, जड शाब्दिक विद्या, कार्यकारणभावाचे अज्ञान यामुळे हा देश जडमूढ, दुर्बळ, गलितगात्र असा झाला होता. या प्रत्येक दोषावर त्यांनी आपल्या निबंधातून प्रहार केले आहेत. प्राचीन परंपरेचा त्यांना फार अभिमान होता. केव्हा केव्हा ते त्याच्या आहारी जात. पण सामान्यतः लोकशाही व राष्ट्रनिष्ठा या त्यांच्या आड येणाऱ्या भारतीयांच्या अवगुणांची चिकित्सा करून ते नाहीसे करण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रत्येक निबंध त्यांनी लिहिला आहे.

भौतिक दृष्टी
 सामाजिक, धार्मिक क्षेत्रात आगरकरांची मते फार तीव्र असली तरी राजकीय क्षेत्रात ते विष्णुशास्त्री यांच्या इतकेच कडवे होते. इंग्रज या देशाचा रक्तशोष करीत