काही संवेदनशील काम करणा-या संस्था आहेत. श्रद्धानंद महिलाश्रम, माटुंगा, मुंबई, बालकल्याण संकुल, कोल्हापूर, स्वप्ननगरी सिंधुदुर्ग (अपंग पुनर्वसन),लांजे महिलाश्रम... यांची रोल मॉडेल्स केव्हा विकसित होणार? का हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाचं समन्स आलं, तरच करायचं या मानसिकतेतून बाहेर येऊन या मुली, महिलांचे आपण कोण लागतो असा बांधिलकीचा भाव, पाझर आपण निर्माण करणार, जपणार!
१०) संस्थांचे कोंडवाडे 'घर' करायचे तर........
महिला, बाल, अपंग, वृद्ध, मतिमंद, मूक-बधिर, कुमारीमाता, अनाथ मुलं, बलात्कारित भगिनी, अल्पवयीन वेश्या या सा-यांनी बनलेलं वंचितांचे विश्व आज समाज घराबाहेरचं एक तुटलेलं बेट आहे. तिथं जा. प्रसंगाने जा. डोकवा. सतत जात रहा. तुमच्या सतत जाण्याने या कोंडवाड्याचे कायम बंद दरवाजे किलकिले होतात... उघडतात. या विश्वाशी जिव्हाळ्याचं नातं जोडा, जपा. त्यांचे हितचिंतक बना. देणगीदार नका होऊ. तुमच्या मुलांच्या चेह-यावरचं हास्य या मुलामुली, महिलांच्या चेह-यावर परावर्तित, प्रतिबिंबित कसं होईल ते पहा. मी कोल्हापूरच्या ‘रिमांड होम' चं रूपांतर ‘बालकल्याण संकुल'मध्ये करताना केलेले छोटे-छोटे प्रयोग आज उगीच आठवतात. संस्थेच्या खोल्यांचे तुरुंगसदृश उभे गज काढून मी पाना-फुलांचे डिझाइन्स असलेली ग्रिल्स बसवली होती. संस्थेत सर्वत्र एक रंगाऐवजी प्राणी, पक्षी, फुलपाखरं, ढग, ‘तारे जमीं पर' आणले होते. प्रत्येक मुलामुलींनी दिवाळीला आपले कपडे आपणच निवडायचा उपक्रम आर. के. मेहता या माझ्या मित्रांमार्फत राबविला होता. रोटरी क्लबने सर्वांना स्लिपर्स दिले होते. एक फुलवाला नागपंचमी, गुढीपाडव्याला गजरे पाठवायचा. अविनाश वाडीकर नावाचे मित्र मुलांना रोज पाच लिटर दूध द्यायचे. त्यांनी मोटर घ्यायची सोडून दिल्याचं आठवतं. मुलींच्या लग्नात पोलीस बँड असायचा.(पोलीस नुसते मुलं पकडून आणायचे नाहीत.) कार्यक्रम करून दरवर्षी हजारो रुपयांची मदत पोलीस द्यायचे. माझ्यासमोर या संस्थेचा चालू अहवाल, अंदाजपत्रक (२०१२-२०१२) आहे. संस्थेचं बजेट दीड कोटींचं आहे. हे होऊ शकतं, आपण घोकणार की करणार?
माझ्या मनात शासन, समाज, संस्था, अधिकारी, कर्मचारी यांच्याविषयी