पान:महाराजा सयाजीराव आणि महात्मा गांधी.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समन्वयामुळे' गांधींची दांडी यात्रा बडोद्यातून निर्विघ्नपणे पुढे गेली. त्यानंतर महिनाभरातच गांधींना दांडी येथे ब्रिटिश सरकारने अटक केली.
लक्ष्मीविलास पॅलेस भेट
 महाराज सयाजीराव आणि महात्मा गांधी यांच्यातील नात्याचे अचूक विश्लेषण करणारा प्रसंग बाबा भांड यां त्यांच्या 'लोकपाळ राजा सयाजीराव' या पुस्तकात उद्धृत केला आहे. तो त्यांच्याच शब्दात समजून घेणे मननीय ठरेल. बाबा भांड लिहितात, “एके दिवशी महात्मा गांधींकडून महाराजांना निरोप आला - “बापू आम्ही तुम्हाला भेटायला लक्ष्मीविलास पॅलेसवर येतो.” महाराजांना आनंद झाला; पण त्याहून आश्चर्यही वाटले. ब्रिटिश सरकार दोघांकडेही संशयाने बघत असताना महात्मा गांधींची बडोदा गुप्तभेट ठरली. महाराजांनी कर्नल अनंतराव सडेकर पवार यांना बोलावले. ते महाराजांचे एके काळचे विश्वासू ए.डी.सी. होते.
 "महात्मा गांधी भेटायला येत आहेत. भिंतीला कान असतात. तुम्ही साबरमतीपासून इथपर्यंत गांधींच्या गुप्तप्रवासाची आखणी करा.” महाराजांनी अनंतरावावर जबाबदारी सोपवली. विश्वासू माणसं साबरमतीला पाठवली. महात्मा गांधी बडोद्यात आले. लक्ष्मीविलास पॅलेसच्या प्रवेशद्वारी महाराजांनी गांधींचे स्वागत केले.

 प्रवेशद्वारासमोरील जिन्यामधून महाराज गांधींना घेऊन ऐने

महाराजा सयाजीराव आणि महात्मा गांधी / १४