पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

या दूरदृष्टीने महाराजांनी केलेले प्रयत्न ते कलासक्त असण्याचे मोठे उदाहरण आहे.
बडोदा संस्कार नगरी
 महाराजांनी आपला भारतीय सांस्कृतिक कलावारसा न गमवता त्यात यथाशक्ती वाढच केली, हेच त्यांच्या खऱ्या स्वदेशी वृत्तीचे लक्षण होय. कलाकारांच्या कला सादरीकरणात सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने कला सादरीकरणासाठीचा टापटिपीचा आणि शिस्तीचा अभाव दूर करण्यावर सयाजीरावांचा विशेष कटाक्ष होता. तबला, तंबोरा इत्यादी वाद्यांचा सूर जुळेपर्यंत तसेच आपला सूर लागला असल्याचे समाधान गायकाला मिळेपर्यंत तासनतास निघून जात, त्यानंतर मूळ मैफीलीची सुरुवात होत असे. त्यांचा असाही आग्रह असायचा की, नाटकांचे खेळ भल्या पहाटेपर्यंत चालू नयेत. नाटक कटाक्षाने रात्री आठ वाजता सुरू होऊन मध्यरात्रीपूर्वी संपावे. महाराजांनी प्रजेला उत्तोमत्तम कला-संस्कार करण्याच्या हेतूने संगीतकलेस प्राधान्य देणे हे आपले कर्तव्य समजून asोद्याला संस्कार नगरी करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. त्यासाठी महाराजांनी आपले आत्मबळ, धैर्य, सबूरी, अथक मेहनत व दुरदृष्टी पणाला लावलेली दिसते. यामुळेच महाराजा सयाजीराव यांच्या उदार आश्रयाखाली कला- कलोपासकांची सांस्कृतिक नगरी बडोद्यात उभी राहिली.

●●●
महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण / ३५