पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणि अलीहुसेन खाँ, खुद्द बडोद्याचे फैजमहंमद खाँ, मौला बक्ष खाँ आणि फैयाज खाँ या प्रसिद्ध कलाकारांचा समावेश होता.
 या संगीत परिषदेसाठी भारताच्या विविध राज्यांतून संगीततज्ञ आले होते. ही घटनाच सिध्द करते की चित्रकलेच्या क्षेत्राप्रमाणेच भारतीय शास्त्रीय संगीताला सयाजीरावांसारख्या संस्थानिकांनी ब्रिटिश सत्तेच्या सापेक्ष काळातही वाचवली होती, नव्हेतर अजून सुधारीत करून त्याला राजाश्रय देऊन कलाकारांचा सन्मान वाढविला होता. त्यामुळे महाराजा सयाजीरावांना ललितकलेबद्दल असलेली आस्था आणि त्यांनी त्यासाठी केलेली प्रचंड आर्थिक मदत हे त्यांच्या सुधारणावादी कलासक्त स्वभावचा एक पैलू आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
बालगंधर्व आणि बडोदा राजाश्रय, १९१९
 बालगंधर्व म्हणजे नारायण श्रीपाद राजहंस (देशपांडे) यांच्या गाणाऱ्या गळ्यानं कित्येक पिढ्यांना रिझवलं, खुलवलं आणि फुलवलं आहे. संगीत नाटकात आज त्यांचे नाव अजरामर झाले आहे. नारायण राजहंसचे स्वर ऐकून लोकमान्य टिळकांनी त्यांना “बालगंधर्व” ही उपाधी बहाल केली. बालगंधर्वांचा जन्म पुण्यात २६ जून १८८८ रोजी झाला. १९११ पर्यंत गंधर्वांची कीर्ति सर्वत्र पसरली होती आणि १९१३ साली त्यांनी 'गंधर्व नाटक मंडळी' ची स्थापना केली.

 मुंबईत येथे आलेल्या बडोद्याच्या रावसाहेब शिरगावकरांना बालगंधर्वांनी सयाजीरावांचा राजाश्रय मिळवून देण्याची विनंती

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण / २६