४. मराठी आधुनिक साहित्य : वंचित साहित्याची विस्तारित क्षितिजे
सन १८१८ मध्ये मराठी राज्य संपुष्टात आले. महाराष्ट्रात ब्रिटिशांची सत्ता सुरू झाली. तेव्हापासून ते राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना सन १८८५ ला होईपर्यंतचा सुमारे सात दशकांचा काळ हा मराठी साहित्य इतिहासात ‘अव्वल इंग्रजी कालखंड' म्हणून ओळखला जातो. या कालखंडात प्रामुख्याने संस्कृत आणि इंग्रजी साहित्याची भाषांतरे करून ती प्रकाशित करण्याकडे तत्कालीन लेखकांचा कल दिसून येतो. त्यानंतरचा १८८५ ते १९२० काल अर्वाचीन मानला जातो. केशवसुत, हरी नारायण आपटे, बालकवी, गोविंदाग्रज, ना. वा. टिळक, कवी एकनाथ पांडुरंग रेंदाळकर, लोकमान्य टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर, प्रभृती साहित्यिकांचा काळ मराठी साहित्याच्या संदर्भात सुधारणा काळ' म्हणून ओळखला गेला पाहिजे. या काळातील साहित्यिकांनी केलेले लेखन हे विचार, आचार, चालीरीती, प्रथा, परंपरा, धारणा, सामाजिक समस्या, जात, धर्म इत्यादी सर्वच क्षेत्रांत सुधारणांचे समर्थन करणारे व प्राचीनतेस छेद देणारे असल्याने अर्वाचीन ठरते.
सन १९२० ला पहिले महायुद्ध संपले तेथपासून ते दुस-या महायुद्धाअखेरचा (१९४५) काळ मराठी साहित्याचा आधुनिक काळ होय. रविकिरण मंडळाच्या कवी गिरीश, माधव ज्यूलियन, यशवंत, आदींनी 'तुतारी'नंतरची आपली कविता प्रखर आणि प्रगल्भ केली. गद्यात खांडेकर-फडके यांनी कथा, कादंबरी विकसित केली.
सन १९४५ नंतर ते महाराष्ट्र राज्याची स्थापना होईपर्यंतच्या सुमारे पंधरा वर्षांच्या कालखंडात उपरोक्त साहित्य अत्याधुनिक झाले. ते समकालीन साहित्य म्हणूनही ओळखले जाते. या काळातील साहित्याने समकालीन जाणिवा साहित्यात प्रतिबिंबित केल्या. प्रा. बा. सी. मर्लेकर, गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले यांनी नवकाव्य आणि नवकथा रूढ केली.
स्वतंत्र महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीला स्वतंत्र आणि अस्मितेचे धुमारे फुटणे स्वाभाविक म्हणायला हवे. सन १९६० नंतरच्या सुमारे पंचवीस वर्षांच्या कालखंडात मराठीत ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, स्त्रीसाहित्य असे नवप्रवाह निर्माण झाले. या नि पूर्वीच्या कालखंडात दलितेतर वंचितांबद्दल लेखन होत आलं; पण त्याचा स्वतंत्र प्रवाह म्हणून साहित्य इतिहासात नोंदला गेला नसला तरी तो अस्तित्वात होता.