पान:भूमी आणि स्त्री.pdf/७६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वयाच्या ८ व्या वर्षी तिचा विवाह करण्याची रुढी पडली असावी. 'भारतीय विवाह संस्थेचा इतिहास' या शोधग्रंथात इतिहासाचार्य ११कै. वि. का. राजवाडे नोंदवितात की, अग्नी आणि प्रजोत्पादन यांचा नित्य संबंध दाखवणारी अनेक वाक्ये ऋग्वेद आणि यजुर्वेदात आहेत. 'प्रजनन ज्योतिः' (तै.सं. कांड ७, प्रपाठक, अनुवाद) या वाक्यात पुरुष जननेन्द्रियाला अग्नीची ज्योत म्हटले आहे. सुमारे बावीसशे वर्षांपूर्वी मनुस्मृती लिहिली गेली. त्यावेळीही ८ व्या वर्षी मुलीचा विवाह करावाच हा सामाजिक संकेत होता. 'न स्त्री स्वातंत्र्यमर्हति' म्हणणारा मनुही, गर्भवती स्त्रिया, वधू आणि युवती यांना पाहुण्यांच्या अगोदर जेवण द्यावे' असे म्हणतो. राजस्थानी समाजात, विवाहप्रसंगी देवक मांडताना जेथे अग्नी पेटविला जातो तेथेच पहिली रात्र नववधूवरांना काढावी लागते. अतिप्राचीन समाजात अग्निकुंडाजवळ, अग्नीच्या साक्षीने समागम केल्यास प्रजावृद्धी होऊन मनुष्यबळ वाढते अशी समजूत होती.
 गौरी : अष्टवर्षा कन्या -
 काळाच्या ओघात, स्त्री ही भूमीस्वरूप असून तिच्यावर विशिष्ट पुरुषाची मालकी असली पाहिजे, त्याने बीज पेरावे आणि उगवलेले पीकहीं घ्यावे ही रूढी निर्माण झाली. त्यातूनच तिच्यात स्त्रीत्वाची वैशिष्ट्ये निर्माण होण्यापूर्वी, सोम गंधर्व अग्नी यांनी तिचा उपभोग घेण्यापूर्वीच तिचा नियंता, मालक ठरविला जाऊ लागला.
 वा. शि. आपट्यांच्या संस्कृत शब्दकोशातील अर्थानुसार 'गौरी' म्हणजे आठ वर्षाची, अनाघ्रात - Virgin अशी पवित्र कन्या तसेच गौरी म्हणजे पृथ्वी (The Earth) वरुण पत्नी (Wife of Varuna), तुळशीचे झाड, माल्लिका उर्फ जाईची वेल हे होत.
 महाराष्ट्रात गौरीचे व्रत भाद्रपदात विविध प्रकारे पाळले जाते. गौरी म्हणजे अनाघ्रात अष्टवर्षा कन्या. कोकणातील चान्द्रसेनीय कायस्थ प्रभूच्या समाजात अष्टवर्षा अनाघ्रात कुमारिका तेरड्याची झाडे एका नव्या कापडात गोळा करून आणते. त्यालाच 'गौरी' म्हणतात. ही झाडे एखाद्या तांब्यात एकत्र ठेवून त्यांना 'गौर' म्हणून वस्त्रे दागिने घालून मांडतात. अष्टवर्षा कन्या ती झाडे घेऊन संपूर्ण घरातून फिरते. प्रत्येक खोलीत प्रवेश करताना तिला विचारतात -

भूमी आणि स्त्री
७१