पान:भूमी आणि स्त्री.pdf/७०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 केरळात हा उत्सव शेतीचा हंगाम संपल्यावर मकरम महिन्याच्या अखेरीस (जानेवारी - फेब्रुवारी) साजरा करतात. पहिल्या दिवशी धान्यागारांच्या दारांना काटे व केरसुणीचे फड लावून ती बंद करतात. तीन दिवस ती उघडत नाहीत. या काळात धान्य विकत नाहीत. घर, अंगण, बागा यांची झाडझूड करीत नाही. सारवण वा शिंपण करीत नाहीत. शेतीच्या अवजारांना स्पर्श करीत नाहीत. चौथ्या दिवशी दारे उघडतात. त्यानंतर टोपलीभर पाने शेतात नेऊन खतात मिसळतात. शेताची भाजणी करतात.
 बंगालात हा उत्सव आषाढ शुक्ल सप्तमी ते दशमी करतात. या काळात दूधात आमरस मिसळून ते पितात. असे केल्यास वर्षभर सर्पदंशाचे भय राहत नाही अशी श्रद्धा आहे. सर्प हे पुरुषंद्रियाचे प्रतीक आहे. रजस्वला अवस्थेत पुरुष समागम करीत नाहीत. नाग स्वतः पुरुषाचे प्रतीक असल्यामुळे तो रजोद्रव्य पिणाऱ्यांना स्पर्श करणारा नाही अशी यातूश्रद्धा या दुग्ध आमरस मिश्रित पेयामागे असावी.
 ओरिसातील रजउत्सव ज्येष्ठाचा अखेरचा दिवस आणि आषाढातील दोन दिवस अशा तीन दिवसांचा मानला आहे. या काळात नांगर धरणे, पेरणी करणे, खोदणे कुटणेया क्रिया बंद ठेवतात विशेषतः कुमारी मुली आणि नववधू अनवाणी पायांनी भूमीला स्पर्श करीत नाहीत. केवळ फळे खाऊन राहतात. हिंदोळ्यावर झुलत गाणी म्हणतात. महाराष्ट्रातही नागपंचमीच्या काळात झुला अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. नागपंचमीच्या आदल्या दिवसापासून तीन दिवस जमिनीला दुखवीत नाहीत याची चर्चा नागपंचमी उत्सवाच्या वेळी विस्ताराने केली आहे.
 कौमार्य अनाघ्रात असते -
 कौमार्याची कल्पना अतिशय मधुर आणि सुंदर आहे. कौमार्य हे अनाघ्रात असते. स्त्रीजातीची सुकुमारता आणि सर्जन क्षमता त्यातून व्यक्त होते. कौमार्य हे विकासोन्मुख असते. तुळस, जाईची वेल, केळी-कर्दळी, रुई यांची तुलना कुमारिकेशी केली जाते. कवि कालिदासाच्या 'शाकुन्तलम्' मध्ये शकुन्तला जेव्हा दुष्यन्ताकडे जाण्यास निघते तेव्हा जाईच्या वेलीत तिच्या उत्तरीयाचे.... ओढणीचे टोक अडकते. जणु जाईची वेल तिला प्रेमाने अडवीत असते. छिंदवाड्यातील भारिया आदिवासी कुमारिकेला रुईच्या झाडाची उपमा देतात. व्यवहारात सर्वसाधारणपणे ज्या स्त्रीशी पुरुषाचा शारीरिक संबंध आलेला नसतो अशा स्त्रीस कुमारिका म्हटले

भूमी आणि स्त्री
६५