पान:भूमी आणि स्त्री.pdf/४९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे. मराठवाड्यात कानबाई पूजिली जात नाही. हिला कानबाई रानबाई असे म्हणतात. कानबाई ही वेदोत्तरकालीन देवता असली तरी ती मूलतः पृथ्वीचे आदिमायेचे रूप आहे. कानबाई ही सूर्यपत्नी मानली जाते. वेदोत्तर काळात पृथ्वी सूर्यपत्नी म्हणून मान्यता पावली. गुजरात सौराष्ट्रात राणलदे - रन्नादेवी - रांदल या नावाने सूर्यपत्नी म्हणून ती पूजिली जाते. महाराष्ट्र भारताच्या दक्षिण उत्तरेच्या मध्यावर आहे. भारतात स्थिर झालेल्या द्रविड आणि वैदिक आर्य या दोनही टोळ्यांचे संस्कार महाराष्ट्रातील उत्तर व दक्षिणेतील सांस्कृतिक जीवनावर आढळतात. महाराष्ट्रातील उत्तर भागात म्हणजेच खानदेशाने आर्यांचे संस्कार तर दक्षिण भागाने द्रविडांचे संस्कार स्वाभाविकपणे आपलेसे करून घेतले आहेत.
 नागपंचमीनंतर येणाऱ्या रविवारी कानबाईची प्रतिष्ठा केली जाते. तिला रोटाचा नैवेद्य दाखवतात. कानबाईचे रोट असे म्हटले जाते. काही घरांतून पुरणाचे रोट करतात. सव्वाच्या मापाने रोट केले जातात. उदा. - सव्वा पावशेर, सव्वाशेर, सवामण. भारतीय विधीविधानात सव्वा या आकड्याला विशेष महत्त्व आहे. सव्वा हे सतत वाढणाऱ्या.... निरंतर वाढणाऱ्या समृद्धीचे प्रतीक आहे. हे रोट कुळातील व्यक्तींनीच खायचे असतात. कानबाईच्या जोडीने रानबाईची पूजा होते. दोघींचा जोडीने उल्लेख असतो. धुळ्याचे इतिहास संशोधक १२भा. रं. कुळकर्णी यांच्या मते या दोघी वेदात उल्लेखिलेल्या रण्णा-सण्णा देवता होत. कानबाईच्या स्थापनेसाठी १०८ वनस्पतींची पाने, पाच ते सात नद्यांचे पाणी, शिवेची वा नदीकाठची माती जिला ते कस्तुरी म्हणतात लागते. ही माती पत्रावळीवर पसरून त्यांत सात प्रकारची धान्ये पेरतात. कानबाईसमोरील नैवेद्य घरच्यांनीच खावयाचा असतो. तो संपला नाही तर त्याला बरकत असे म्हणतात. ते बरकत अन्न घरात खड्डा खणून त्यात टाकतात. स्वयंपाकात उरलेले पाणी त्या खड्ड्यात टाकतात. त्या खड्ड्याला 'संमिंदर' म्हणतात. या पद्धतीत आणि मराठवाड्यात लक्ष्म्याच्या वेळेस अन्न शेतात पुरण्याच्या पद्धतीत खूप साम्य आहे, ही बरकत समृद्धी भूमीत पुरायची म्हणजेच भूमीची सुफळ होण्याची शक्ती वाढविण्याचाच एक विधी. हे व्रत मराठवाड्यात पाळले जात नसले तरी ते भूमीच्या सुफलीकरणाशी संबंधित आहे.
 आसरा -
 मराठवाड्यातील ग्रामीण भागात आसरा हे दैवतही महत्त्वाचे मानले जाते. विहीर, डोह किंवा हिरवे विशाल वृक्ष यांच्या आश्रयाने आसरा राहतात अशी ग्रामीणांची

४४
भूमी आणि स्त्री