पान:भूमी आणि स्त्री.pdf/४७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तर प्राथमिक कृषिजीवी समाजाची रचना मातृसत्ताक, स्त्रीप्रधान असते. नांगराचा शोध लागून शेती प्रगतावस्थेत गेली, त्याला पशुव्यवसायाची जोड मिळाली आणि स्त्रीसत्ताक समाज व्यवस्था लुप्त होऊन पुन्हा पुरुषप्रधान व्यवस्था निर्माण झाली. अगदी प्राथमिक अवस्थेत पुरुषांकडे विशिष्ट काम नव्हते. पण स्त्रीकडे मात्र मुलांच्या संगोपनाची जबाबदारी नैसर्गिकपणे आली होती. या श्रमविभागपूर्व अवस्थेत, सामाजिक संघटनेत स्त्रीचे स्थान अधिक महत्त्वाचे होते. कारण रति (Sex) आणि वात्सल्य या दोन नैसर्गिक नात्यांत वात्सल्याला अधिक महत्त्व होते. जनन प्रक्रियेतील पुरुषाचे स्थान समाजाला अज्ञात होते आणि माता मात्र प्रत्यक्ष दिसे. साक्षात असे. स्त्रीच्यात भूमीप्रमाणे यात्वात्मक सामर्थ्य आहे असे आदिमानवाने कल्पिले. त्यातून स्त्रीमाहात्म्याचा काळ सुरू झाला. नांगराने शेती सुरू झाल्यावर ते लुप्त होत गेले. या संदर्भात डॉ. कोसंबी१० ऐतिहासिक सत्य मांडतात.
 'Matriarchal institutions still survive in these parts of the country that took last to the plough economy.'
 प्राथमिक अवस्थेतील कृषिव्यवसाय स्त्रीनेच, तिच्या ठिकाणी असलेल्या 'यात्वात्मक सामर्थ्याच्या साहाय्याने' विकसित केला. त्यामुळे कृषिप्रधान समाजव्यवस्थेत मातृसत्ता रूढ झाली. नांगराचा शोध लागल्यानंतरही कृषिदेवता स्त्रीरूप-भूमीस्वरूप राहिल्या. आजही ज्या ज्या ठिकाणी भूमीच्या सुफलीकरणाची व्रते आणि यातुविधी आचरले जातात. त्या ठिकाणी त्या व्रताचरणांत स्त्रीलाच प्राधान्य असते. आजही ही श्रद्धा कृषिजीवी समाजात आहे. या संदर्भात ब्रिफॉ लिहितो -
 ११'The fecundity of the earth and the fecundity of women are viewed as one and the same quality.'
 या संदर्भातील विस्तृत चर्चा 'भूमीच्या सुफलीकरणाशी निगडित विधी उत्सवातील स्त्री प्रधानता' या प्रकरणात केली आहे.
 गौरीपूजा : सर्जनाची पूजा -
 महाराष्ट्रात पूजिले जाणारे गौरी हे दैवत भूमीच्या सर्जनक्षमतेचे प्रतीक आहे. केवळ महाराष्ट्रात नव्हे तर राजस्थान, उत्तर भारत, मध्य प्रदेशातही गौरीची पूजा भाद्रपदात आणि चैत्रात होते. हे स्त्रियांनी करावयाचे व्रत आहे. भाद्रपदात येणाऱ्या गौरींना मराठवाड्यात लक्ष्म्या असे म्हणतात. गणेशचतुर्थीनंतर ४ दिवसांनी लक्ष्म्या

४२
भूमी आणि स्त्री