पान:भूमी आणि स्त्री.pdf/३०३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

fruits, plants and leaves. That is why they are brought in contact with female reproductive organ."
 मराठवाडा महाराष्ट्रात 'घट बसवणे' हा शब्द नवरात्रीसाठी वापरला जातो. सटीचे नवरात्र असो वा शाकंभरीचे, 'घट बसणे' हा विधी असतोच. या विधिउत्सवाची सविस्तर चर्चा या पूर्वी केली आहे. या व्रतात स्त्रीप्रधानता असल्यामुळे पत्री, फुले,फळे, धान्य, पाणी, माती, मातीचे घट, दुर्वांकुर, विविध प्रकारच्या भाज्या, अन्नप्रकार, रांगोळ्यांच्या विशिष्ट आकृती, धान्याची चौक मांडणी आदी बाबींना विशेष महत्त्व असते. वर्षनाशी संबंधित भूमीचे सुफलता विधी पाऊसकाळात आधिक्याने येतात. या सर्व विधीउत्सवांची सविस्तर चर्चा यापूर्वी केलेली आहे.
 मर्म हरवले : औपचारिकता शिल्लक राहिली -
 सुफलन विधिउत्सवांचे स्वरूपांतील स्त्रीप्रधानता राहिली मात्र त्यातील तिच्या 'स्त्रीत्वा' चा गौरव, तिचे सामाजिक आर्थिक संघटनेतील महत्त्व व सहभाग या बाबी नाहीशा झाल्या. सुफलन विधींमध्ये असलेल्या 'स्त्री' या व्यक्तीचा आत्मसन्मान होता. तिच्यातील गुणांना सामाजिक मान्यता होती. समाजाचा महत्त्वाचा घटक असलेली स्त्री, समाजाच्या आवश्यक अशा दैनंदिन गरजा-अन्न, वस्त्र निर्माण करणारी होती. आजही शेतीची मशागत स्त्रियाच प्रामुख्याने करतात. शंभर वर्षा पूर्वीपर्यंत ग्रामीण भागात डाळी-साळी तयार करणे, शेतीसाठी लागणाऱ्या बीजकरणासाठी शेतातील चांगली कणसे, फळे, भाजीपाला राखून त्यांपासून चांगले बीज तयार करणे. दळणकांडण करणे आणि अन्न शिजविणे या सर्व गोष्टी कुटुंबातील स्त्रियाच करीत. परंतु समाजात पुरुषप्रधान जीवन व्यवस्था आली, राज्यव्यवस्था आली, उत्पादनाच्या आणि युद्धाच्या साधनांचा विकास होऊ लागला आणि स्त्रियांचे समाजातील महत्त्व कमी झाले. त्या 'दास 'झाल्या. समाजाचा महत्त्वाचा घटक म्हणून त्यांचे उत्पादनात असलेले स्वयंभू महत्त्व संपले. त्यांचे कष्ट, श्रम कमी झाले नाहीत. त्यांच्या जोडीला समाजातील दुर्बल घटक म्हणून त्यांच्यावर होणारे अत्याचार मात्र वाढले.

२९८
भूमी आणि स्त्री