पान:भूमी आणि स्त्री.pdf/३००

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संदर्भ सापडतात.
 संस्कृतीच्या विकास क्रमात, 'आत्मदेहसमुद्भव' माझ्या देहातून वनस्पतीसृष्टी निर्माण करून संपूर्ण जगाचे मी पोषण करीन असे सांगणारी शाकंभरी - बनशंकरी - दुर्गा केवळ व्रतात विधिउत्सवात बंद झाली. 'मी मित्रवरुणांची धारणपोषण करणारी आहे. अग्नी, इंद्र, अश्विनी देव यांची धात्री मात्र आहे. सोमाला सामर्थ्य मीच देते... सर्व विश्वावर अधिसत्ता चालविणारी मीच आहे. सारे प्राणिमात्र माझ्या कृपेने जगतात. अन्नउदक चलनवलनाचे सामर्थ्य सर्व माझ्यामुळेच त्यांना मिळते. असे सांगणारी ऋग्वेदाच्या १० व्या मंडलात भेटणारी अंभृणी या साऱ्याच देवता, ज्यांचे स्वतंत्र अस्तित्व होते त्यांचे मनस्वीपण हरवले. त्यांचे प्रत्यक्षरूप स्त्रीत पाहिले गेले ती 'स्वयंपूर्णा', 'स्वयंसिध्दा', 'मनस्विनी' स्त्री केवळ 'देहस्विनी' उरली. वैदिकांपूर्वीच्या कृषिप्रधान जीवनव्यवस्थेतील मातृसत्ताक जीवन व्यवस्थेतील स्त्री उत्पादनात सहभागी होती. समाजाच्या सामाजिक,आर्थिक, कुलाच्या संघटनात ती केन्द्रबिंदू होती. तिचे महत्त्व मुलाला जन्म देणारी म्हणून इतपतच शिल्लक राहिले. तिचे अस्तित्व आणि भाग्य 'मुलग्याची' आई आणि 'जिवंत असलेल्या पतीची 'पत्नी' इथवर मर्यादित झाले.
 सांस्कृतिक एकात्मतेची वाहक आणि चेतक स्त्री -
 सुफलनविधी उत्सवांतील स्त्रीप्रधानता, देवीमाहात्म्य : मातृसत्ताक कृषिसंस्कृती यांतील अनुबंधातून आली आहे. हे निखळ सत्य आहे. आजची हिंदू संस्कृती अनेकविध टोळ्यांच्या सांस्कृतिक संकरातून निर्माण झाली असून या संस्कृतीच्या एकात्मतेचा गाभा या 'संकरात' आहे. संघर्ष, स्वीकार, समन्वय, समरसता या प्रक्रियेतून ही एकात्मता झाली असून त्याच्या वाहक आणि चेतक स्त्रिया आहेत. मातृसत्ताक समाज पद्धती, गणसत्ता व कृषिसंस्कृतीचे परिवर्तन होऊन समाजात वर्ग निर्माण झाले. विविध जातिजमातीत समाज विभागला जाताना, त्या जाती शूद्रात घालायच्या की वरिष्ठात घालायच्या हे अनुलोमप्रतिलोम विवाहांतून ठरवले गेले. हा काळ मातृसत्तकेडून पुरुषसत्ताक पुरुषकेन्द्री व्यवस्थेकडे जाण्याचा काळ असल्याने वरिष्ठ वर्णाच्या स्त्रीने कनिष्ठ वर्णाच्या पुरुषाशी समागम... विवाह केल्याने निर्माण होणाऱ्या संततीवर शूद्र जातीचा शिक्का मारला गेला. पुरुष ज्या वर्णाचा असेल त्यावर संततीचा दर्जा ठरू लागला. वरिष्ठ

भूमी आणि स्त्री
२९५