पान:भूमी आणि स्त्री.pdf/२८५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जीवनरहाटी, असे तिचे आजचे रूप आहे. भारतात अनेक टोळ्या आपापली दैवत विकल्पने, श्रद्धा, कर्मकांडे घेऊन आल्या. संघर्ष, स्वीकार, समन्वय, समरसता यांतून ही संमिश्र तरीही एकात्म जीवनरहाटी निर्माण झाली. म्हणूनच 'हिंदू' हा धर्म न राहता ती जगण्याची पद्धती झाली. त्यालाच आपण 'धर्म' ही संज्ञा देतो. यात वैदिक आर्यांची निसर्गपूजा, यातुप्रधान यज्ञयागादी कर्मकांडे, तांत्रिकाची वामाचारप्रधान स्त्रीसाधना, वेदान्त्यांचा ब्रह्मवाद, ऐहिक कामनापूर्तीसाठी आचारवयाची व्रतवैकल्ये, मंत्रतंत्र, ग्रामदेवता, स्थलदेवता, जलदेवता, वनस्पती वा शाकांभरी देवता, रोगनिवारण व बालकाचे पोषण करणाऱ्या देवता, अशा देवतांचे मंत्रतंत्रात्मकविधी, देवाला तृप्त करण्यासाठी पशुबळी वा मुले सोडण्याचे विधी आणि उपचार हे सारे हिंदू धर्माच्या विशाल छत्राखाली नांदतात. यातील बहुतेक विधी आर्यांच्या विचार विश्वाशी विसंगत असून ते आर्येतर समाजातून आले आहेत.
 भारतातील सर्व शक्तिपीठे अवैदिक देवी उपासनेची केंद्रे आहेत. जगदंबा, यल्लमा, रेणुका आदी स्त्री देवतांची पूजा करताना पुजाऱ्यांना स्त्रोवेश धारण करावा लागतो. या उपासना वैदिकांच्या कक्षेबाहेरच्या आहेत. विशेष करून दक्षिणेतील धार्मिक सांस्कृतिक जीवनावर अवैदिक आर्येतर समाजातील आचारविधींचा प्रभाव आढळतो. स्त्रियांच्या आणि बहुजन समाजाच्या श्रद्धाविश्वात ग्रामदेवता, भूदेवता, रोगनिवारक देवता या मातृदेवतांना प्रमुख स्थान आहे.
 घटस्थापना, नवरात्रोत्सव, सटीचे नवरात्र, गौरी गणपती, हरितालिका, चंपाषष्ठी ही व्रते-विधिउत्सव भूमीच्या सुफलीकरणाशी कसे निगडित आहेत याची चर्चा, वरील सणांचा परामर्ष घेताना विस्ताराने केली आहे.
 ऋग्वेदात गौरविलेली अंभृणी देवता : एक अपवाद -
 वैदिक आर्य भारतात आल्यावर त्यांचा येथील विविध टोळ्यांशी, त्यांच्या देवतांशी संबंध आला. आर्यांचे दैवत विकल्पन पुरुषप्रधान आहे. त्यात स्त्री देवतांना महत्त्वाचे स्थान नव्हते. भारतात आल्यावर यज्ञ विध्वंसक शिव, देवी या देवतांशी त्यांचा संपर्क आला. ऋग्वेदातील वन्य देव रूद्राशी शिवाचा संयोग करून 'शिव' ही देवता वैदिकांनी उन्नयित स्वरूपात स्वीकारली. मात्र या संदर्भात एक गोष्ट आश्चर्यचकित करणारी आहे. उत्तरकालीन वैदिक वाङ्मयात 'अंभृणी' या देवतेचा

२८०
भूमी आणि स्त्री