पान:भूमी आणि स्त्री.pdf/२८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असे मानले जाते. या बदलाचे मुख्य कारण हे आहे की, यजुर्वेदकाळातील समाजरचना कृषिव्यवसायाच्या वृद्धीबरोबर टोळीसंघ (ट्रायबल) व्यवस्थेपासून स्थायिक समाजपद्धतीकडे (सेडेंटरी) वेगाने वाटचाल करीत होती. आर्य,आर्येतर लौकिक समूहांचे संकर वाढत होते. संघर्षाबरोबर स्वीकार आणि समन्वयाची प्रक्रिया सुरू होती. या समन्वयातून एकात्म भारतीयत्वाची जडणघडण होत गेली. आजही ही प्रक्रिया अव्याहतपणे सुरू असून यातूनच भारतीयांची 'एकात्मता' आधिकाधिक दृढ होत जाते.
 दैवी दाम्पत्ये: वैशिष्ट्ये -
 वैदिक धर्म पुरुषप्रधान असल्याने प्रत्येक क्षेत्रात पुरुषांचे महत्त्व वाढत गेले. आज या धर्मात देवीची उपासना पुरुषदैवताची पत्नी म्हणून केली जाते. भारतीय संस्कृतीत शिव आणि गौरी, विष्णू आणि लक्ष्मी ही दोन मान्यवर मिथुने आहेत. मात्र सूक्ष्म निरीक्षणांती असे लक्षात येते की, शिव आणि गौरी यांचा दर्जा समान आहे. ते एकमेकांचे सहकारी आणि सहयोगी आहेत . न पटणाऱ्या बाबीबद्दल निषेध नोंदविण्याचे सामर्थ्य गौरीत आहे. तसेच निर्णयप्रक्रियेत ती सहभागी असल्याचे अनेक मिथक् कथातूंन जाणवते. म्हणूनच पुढे सांख्य तत्त्वज्ञान सांगते 'शक्तीशिवाय शिव हा शवासमान आहे' तर 'शिवाशिवायचीशक्ती अघोरी बनते' अर्थात् नंतरच्या पुराणकाळात उमा किंवा गौरीला दुय्यम स्थान देणाऱ्या कथा रचल्या गेल्या.विष्णुपत्नी लक्ष्मीची मूर्ती कायम त्याचे पाय चुरत असते. दिवाळी दसऱ्यास पूजिल्या जाणाऱ्या श्री किंवा जया यांच्यातील परिपूर्ण सामर्थ्य, पाय चुरणाऱ्या लक्ष्मीत नसते. गणेश वा गणपतीची पत्नी म्हणून सरस्वतीची निश्चिती कालौघात झाली. मात्र समाजाने या संकल्पनेला फारसे स्वीकारले नाही. या दोघांना स्वतंत्र महत्त्व आहे. गणेशोत्सवात सरस्वतीचे पूजन करण्याचा संकेत निर्माण झाला नाही. सरस्वतीला समाजात विद्येची, कलेची देवता म्हणून मान्यता आहे. गणेश हा नर्तक आहे तर सरस्वती ही वादक आहे. या दोन्ही देवता विद्या आणि कलेच्या मानल्या जातात.
 प्राचीन देवतांचे उन्नयन -
 मातृसत्ताक जीवनपद्धतीकडून पितृसत्ताक जीवनपद्धतीकडे समाजाची वाटचाल होत असताना आजच्या पूजनीय देवतांचा जन्म झाला. प्राचीन देवतांचे

भूमी आणि स्त्री
२३